मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
शेती फायद्यात चालावी यासाठी उद्योगव्यापार जगताने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज मुंबईत केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर आयोजत 44 वे वालचंद स्मारक व्याख्यान देताना बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, भारतीय उद्योग व्यापार जगत हे जगभरात त्याच्या अव्वल विश्वासार्हते बद्दल प्रसिद्ध आहे. कारण भारतीय माणूस कधीही केवळ पैशाचा विचार करीत नाही, तो समग्र समाजाच्या कल्याणाचा विचार करतो. हीच भारतीय संस्कृती आहे. समाजवादी व्यवस्थेत उद्योगाचे नुकसान करून श्रमिकांच्या फायद्याचा विचार होतो तर भांडवलदार पाश्चात्य व्यवस्थेत श्रमिकांचे नुकसान करून उद्योगांच्या फायद्याचा विचार केला जातो. भारतीय संस्कृताीत मात्र या दोन्ही घटकांच्या कल्याणासह सराव समाजाच्या कल्याणाचा विचार आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले. जगाच्या आजच्या सर्व समस्यांची उत्तरे भारतीय संस्कृतीत आहेत, मात्र ती स्वतःच्या जीवनाच्या उदाहरणातून जगासमोर ठेवावी लागतील, असेही ते म्हणाले. कृषी कर्ज माफ करणे हे शेती समस्यांवरील उत्तर नसून, शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी उद्योग व्यापार जगताने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे असे आवाहन सर संघचालक भागवत यांनी केले. समाज सक्षम करण्यासाठी उद्योग व्यापार व कृषी या सर्व क्षेत्रांनी एकत्र काम करावे लागेल कारण ही सर्व क्षेत्रे परस्पर पूरक आहेत, असे सरसंघचालक भागवत यांनी सांगितले. यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चरचे आजी माजी पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे ही उपस्थित होते. यावेळी चेंबरच्या विशेषांक स्मरणिकेचे प्रकाशनही डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.