डोंबिवली – भारतात १२० कोटी लोकसंख्या असणे महत्त्वाचे नाही, तर त्यासाठी संघटनाची आवश्यकता आहे. आज हिंदू जाती-जातींत विभागले गेले आहेत. आपण सर्व हिंदूच आहोत, या विचाराने एकत्र येणे आवश्यक आहे. आज मी जे काही बोलत आहे, ते मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या विरोधात नाही, तर हिंदु सुधारावे आणि त्यांच्यात संघटितपणा निर्माण व्हावा यासाठी बोलत आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. विराट हिंदूस्थान संगम आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आयोजित भारत : उभरते जागतिक नेतृत्व-एक पाऊल रामराज्याकडे या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी स्वामी यांनी मांडलेली सूत्रे
१. काश्मीरमधील ज्यांना पाकिस्तान हवा आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे आणि ज्यांना भारतात रहायचे आहे, त्यांना जेवढे स्वतंत्र भारतात मिळत आहे, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. कायद्याने भारताचा एकही भाग आपण देऊ शकत नाही आणि जो भाग पाकिस्तानकडे आहे, तो भागही लवकरच भारतात विलीन करू आणि जगाला आपली जागतिक शक्ती दाखवू.
२. आपली एक भाषा असणे आवश्यक आहे. जी संपूर्ण राष्ट्रात बोलली जाणारी भाषा असेल. ज्या भाषेचा शिक्षणासाठी, व्यहारात किंवा न्यायालयात त्याचा वापर करायला हवा. ती भाषा म्हणजे संस्कृत. जर्मन, लंडन यासारख्या बाहेरच्या देेशात संस्कृत शिकवली जाते. नासानेसुद्धा संस्कृत भाषा संगणकासाठी सोपी आहे, असे सांगितले आहे. यासाठी प्रत्येकाने संस्कृत शिकणे आवश्यक आहे.
३. श्रीराम मंदिर उभारणीसाठी मुसलमान समाज हिंदूंच्या बाजूने एकत्र आला, तर आनंदच आहे; मुसलमान त्यांच्या धर्मात सांगितल्यानुसार कोणत्याही मशिदीमध्ये जाऊन नमाजपठण करू शकतात; परंतु हिंदूंना श्रीराम मंदिर बांधण्यासाठी कुठेच सवलत नाही; कारण श्रीराम हे एकाच ठिकाणी जन्माला आले, ती भूमी एकच आहे, ती म्हणजे अयोध्या आणि तेथेच श्रीराम मंदिर निर्माण होणार !
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृतमध्ये करण्यात येत होतेे आणि त्याचा अर्थही सांगितला जात होता.
२. कार्यक्रमाचा आरंभ राष्ट्रगीत आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आला आणि कार्यक्रमाची अखेर सांगता संपूर्ण वन्दे मातरम्ने करण्यात आली.