चांदुर रेल्वे तालुका कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्या संदर्भात गांधी कृषी केंद्र, चांडक कृषी केंद्र, ललीत कृषी केंद्र, जयश्री कृषी केंद्र, कृषीवैभव अॅग्रो एजन्सीज, आरूष कृषी केंद्र, पाटील कृषी केंद्र, कृषी कल्पतरू सह तालुक्यातील एकुण ३५ कृषी सेवा केंद्र गुरूवार २ नोव्हेंबरपासुन कडकडीत बंद ठेवण्यात आले.
यवतमाळ येथे किटकनाशक फवारणी दुर्घटनेवरून महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणी मोहीमेतर्गंत कृषी सेवा केंद्र चालकांच्यावर विविध प्रकारे कारवाई केली जात आहे. परिणामी कृषी सेवा केंद्र चालकालाच सर्वस्वी जबाबदार धरून, त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे . या साठी कृषी सेवा केंद्र चालकांना योग्य न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील खते, बियाणे, किटक नाशक विक्रेते हे २ नोव्हेंबर ते ४ नोंव्हेबर या कालावधीत आपली दुकाने बंद ठेवून, संपावर गेले आहे. तसेच यामध्ये कृषी सेवा केंद्रचालकांच्यावर चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, निलंबित केलेले परवाने पूर्ववत करावेत, ऑनलाईन परवान्यात समाविष्ठ अर्ज ग्राह्य धरावेत, शासनाने ३ ऑक्टोबर २०१७ रोजी काढलेल्या नवीन अध्यादेशाबाबत फेर विचार विनिमय करावा, सर्व किटकनाशक कंपनीना कृषी सेवा केंद्र धारकांना उगमप्रमाण पत्र देणे बंधन कारक करावे , हस्तलिखीत साठा रजिस्टर ऐवजी संगणकीय साठा नोंद ग्राह्य धरावा या मागण्यांचा समावेश आहे. यामुळे शहराताल १२ व परीसरातील २३ असे तालुक्यातील एकुण ३५ कृषी सेवा केंद्र गुरूवारपासुन कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. व अजुन दोन दिवस कृषी केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. कृषी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.