चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)
आजच्या धकाधकीच्या जिवणात मोठमोठ्या हजारो झाडांची कत्तल होउन त्याचा निसर्गावर विपरीत परिणाम होत आहे. परंतु आजही काही समाजसेवक असे आहेत की, आपल्या हाताने रोपटे लावुन गेल्या ४२ वर्षापासुन त्याची सतत जोपासना करून अविरत पाणी देतात. अशाच प्रकारचे कार्य प्रत्येकाने केले तर निश्चितच निसर्ग जपण्यासाठी मदत होईल व त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. अशा समाजसेवी व्यक्तीची सामाजिक संस्था, सरकारी यंत्रणा यांनी दखल घेऊन त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे आताच्या पिढीला यापासुन काहीतरी शिकायला मिळेल.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक सिंधी कॅम्प मध्ये राहणारे ८६ वर्षीय परमानंद उत्तमचंद तिडवानी यांनी गेल्या ४२ वर्षाअगोदर अतिशय रहदारीचा असलेल्या चांदुर रेल्वे शहरातील विरूळ चौकात जिल्हा परीषद शाळेच्या मैदानाच्या कोपऱ्याजवळ एक वडाचं झाड लावलं. व त्या झाडाला तेव्हापासुन जगवुन आपल्या स्वत:च्या हाताने दररोज पाणी वगैरे देऊन त्याची देखरेख करीत आहे. हे लावलेल रोपटं आज महाकाय वृक्ष झालेलं आहे. अशा महाकाय कृक्षाच्या गर्द सावलीच्या खालीच या चौकातील काही युवकांनी एक बजरंग बलीचे मंदिर बांधल्यामुळे लग्नातील प्रत्येक नवरदेव येथे दर्शनासाठी येतात. तसेच या वडाच्या ४२ वर्षाच्या अक्राळ, विक्राळ झाडाने खुप मोठे रूप धारण केल्यामुळे त्याच्या सावलीत शेकडो नागरीक बसलेले दिसतात. आजही हे परमानंद तिडवानी सदर झाडाला न चुकता रोज पाणी टाकतात. वयाची ८६ गाठली तरीही त्यांनी ही सेवा सोडली नाही. अशामुळे तिडवानी यांच्या कर्तृत्वाचा जर प्रत्येकाने बोध घेतला आणि एक झाड लावुन त्याची देखभाल केली तर शासनाला दरवर्षी झाडे लावा, झाडे जगवा म्हणण्याची वेळच येणार नाही. तसेच शासनाचा अब्जावधी रूपयांचा खर्चही वाचेल.
यामुळे शासनाने, सामाजिक संस्थांनी अशा परमानंद तिडवानी सारख्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांचा गौरव केल्यास त्यापासुन इतरांना प्रोत्साहन मिळेल असे मनोगत अनेकांनी व्यक्त केले.