चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची तूर बाजार समितीच्या आवारात पडून आहे. सद्या पावसाचे वातावरण निर्माण झाले असून सुद्धा अजूनपर्यंत हजारो क्विंटल तूर बाजार समितीच्या आवारातच आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची तुर तत्काळ खरेदी करण्यासाठी आज बुधवार १० मे रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रहारचे संस्थापक, अचलपुरचे आमदार बच्चु कडु व शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रहार शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने डेरा आंदोलन होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरातील तुर हमीभावाने खरेदी करा, खरेदी केलेल्या तुरीचा मोबदला २४ तासाच्या आत देण्यात यावा, सरकारने तुर आयातीवर प्रतिबंध लावावा, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संपुर्ण तुरीचा पंचनामा करून तातडीने खरेदी करण्यात यावी या आंदोलनातील प्रमुख मागण्या आहे.
तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली तुर विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावी. कायद्यानुसार शेतीमाल खरेदी अधिनियम १९६३-६७चे कलम २९ नुसार केंद्राने जाहिर केलेल्या हमी भावाने आपली तुर खरेदी करण्यास सरकारला व बाजार समितीस भाग पाडणार असुन आमदार बच्चु कडु व रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या तुर खरेदी डेरा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रहारचे तालुकाध्यक्ष सौरभ इंगळे, विक्रम तायडे, प्रदिप नाईक, शिवसेनेचे राजुभाऊ निंबर्ते, बंडुभाऊ आंबटकर, मनिष कोहरे आंदींनी केले आहे..