मुंबई :-
राज्यात यापुढे आरोपींचा कोठडीत मृत्यू होवू नये, यासाठी गृह खात्याची तातडीने बैठक बोलावण्यात आली असून, त्यानुसार यावर चर्चा करून काय सुधारणा करता येतील यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री ( ग्रामिण ) दीपक केसरकर यांनी दिली.
काल सांगली मध्ये जावून गृहराज्यमंत्री ( ग्रामिण) दीपक केसरकर यांनी कोथळे कुटूंबियांची भेट घेवून भावना जाणून घेतल्या. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. दोन्ही कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणात प्रसिध्द कायदेतज्ञ उज्वल निकम यांच्याकडे या केसची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाशी संबंधित दोन व्यापाऱ्यांची चौकशी सीआयडी मार्फत सुरू असून, सीआयडीने त्या दिशेने तपासास सुरूवात केली आहे.काल सांगलीत जावून स्थानिकांकडून कायदा आणि सुव्यवस्थे संबंधित अडचणी समजून घेतल्या. कोथळे प्रकरणी ज्यांच्या कडून कामचुकार पणा झाला त्यांना निलंबित केले आहे. राज्यात कोठडीत मृत्यू होणे हे योग्य नाही असेही केसरकर यांनी सांगितले.
सांगलीतील कोथळे प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. पण त्यातून काही निष्पन होत नसेल तरच सीबीआय मार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगून या केस मध्ये सीआयडी योग्य दिसेने तपास करत असल्याचे स्पष्ट केले.या प्रकरणाचा सर्व तपास हा २४ तासाच्या आत लागला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी निःपक्षपाती केली जाईल असेही ते म्हणाले.मंजुळा शेट्ये प्रकरण हे कारागृहात घडले होते.त्यामुळे कारागृहात कैद्यांना काय वागणूक दयावी यासाठी प्रयत्न सुरू आहे.
जनतेने पोलिसांना मित्र समजावे यासाठी सुधारणा करणार असून, येत्या ७ दिवसामध्ये संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून परिपत्रक काढणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. सांगलीतील अमोल भंडारे यांच्या कुटूंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.