रुपेश वाळके – मोर्शी –
*मोर्शी तालुक्यात पिके वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे हाताशी आलेले तुरीचे पिके जाण्याची भीती बळीराजाकडून व्यक्त होत आहे. खरीप हंगामातील अल्प पावसामुळे कापूस, सोयाबीन मोठ्या प्रमाणात नुकसानीत आले आहे. सोयाबीनचे बीज भरलेले नसल्याने शेतकरी वर्गांना सोयाबीन काढणीत फक्त १ ते २ क्विंटलचा उतारा आला असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात केलेला खर्च निघण्याची अशा मावळली आहे. आता तुरीचे पीक बहरात आले असताना तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मागील काळात थोड्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे काढून ठेवलेले सोयाबीन, ज्वारी काळी पडली. तसेच तुरीला फुलाची लागवड झाली असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणाने फुल गळून किडी-आळीचा प्रादुर्भाव होऊन पुन्हा शेतकरीवर्गला नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे असे नुकसान होत असले तरी दुसरीकडे पावसाअभावी वाळू लागलेल्या कापसाला पाऊस झाला तर जीवदान मिळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पांढरे सोने समजल्या जाणारे कपाशी व रब्बी हंगामात घेतल्या जात असलेल्या पिकांना फायदा होईल. २०१७ च्या खरीप हंगामात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. शेतीमालाचे नुकसान व कमी भाव मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे सरकारने लक्ष देवून शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सोडविण्यासाठी मदत मिळवून देऊन कापूस, सोयाबीन, ज्वारी यासह अन्य पिकांना हमी भाव मिळवून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताही पर्याय नाही.
किडींचाही प्रादूर्भाव पिकावर झाला आहे.मोर्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक संकटात सापडले आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तुरीवर किडींचा प्रादूर्भाव वाढला असून, फुलांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी विविध प्रयोग करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
*यंदा मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमानात तूर पिकाची पेरणी झाली आहे. सुरुवातीला अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या या पिकाला परतीच्या पावसाने मोठा आधार दिला आणि पीक बहरले. आता हे पीक शेंगा फुलावर असतानाच गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे तूर पिकाची फुले गळणे सुरू झाले असून, पाने खानारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आदि किडींचाही प्रादूर्भाव पिकावर झाला आहे. यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येण्याची भिती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यात शेंगा पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रणासाठी किटकनाशक फवारणीचा पर्याय असला तरी, ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे. आता ढगाळ वातावरण निवळल्यानंतर धुके पडण्यास सुरुवात झाली, तर या पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमागील नैसर्गिक संकटाचे दुष्टचक्र कायमच असल्याचे दिसत आहे.