उडुपी (कर्नाटक) –
श्री श्री रविशंकर यांना मी यापूर्वीच ‘राममंदिराच्या प्रश्नात हस्तक्षेप करू नये’, असे सांगितले होते, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे चालू असलेल्या तीन दिवसीय धर्मसंसदेत केले. ‘राममंदिराच्या निर्माणासाठी धर्मसंसदेनेच नेतृत्व केले पाहिजे’, असेही ते म्हणाले. भागवत म्हणाले, ‘‘श्री श्री रविशंकर माझ्याकडे आले होते. त्यांच्याशी बोलतांना मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, ‘राममंदिराचे काम तुमचे नाही.’ त्यामुळे त्यांच्याशी या विषयावर कोणतीच चर्चा झाली नाही; मात्र त्यांनी माझे ऐकले नाही. एका कार्यक्रमात मी उपस्थित असतांना पुन्हा राममंदिराविषयी ते बोलले. त्यांनी आमच्यासमोर राममंदिराविषयी प्रस्ताव मांडला आणि त्याला पुढे नेण्याची विनंती केली.