महाराष्ट्र सदनात ओडिशा अन्न महोत्सव

0
1013

नवी दिल्ली :- चेना तरकारी, दही चाला, उडिया भात, चाकुली पिठा आदि उडिया व्यंजनांचा आस्वाद घेण्याची खास संधी खवय्यांना मिळणार आहे. औचित्य ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेअंतर्गत ५ डिसेंबर २०१७ रोजी येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओडिशा अन्न महोत्सवाचे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. देशातील राज्या-राज्यांमधील दुरावा कमी होऊन सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून संबंध दृढ व्हावे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. देशातील २९ राज्य आणि ७ केंद्रशासीत प्रदेशांमध्ये असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या भवनांमध्येही या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांतील खाद्य संस्कृतीची देवान घेवान होण्याच्या उद्देशाने २१ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील ओडिशा भवन येथे महाराष्ट्र अन्न महोत्सवा साजरा करण्यात आला. ५ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र सदनात दुपारी १२ ते ३ या कालावधीत येथील उपहार गृहात ओडिशा अन्न महोत्सव साजरा होणार आहे.

या महोत्सवाचे उदघाटन उभय सदनांच्या निवासी आयुक्तांच्या हस्ते व वरिष्ठ अधिकारी व गणमान्य पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अन्न महोत्सवात खवय्यांसाठी खास ओडिशाचे व्यंजन उपलब्ध होणार आहेत. यात मुख्यत्वे चेना तरकारी, घांटा तरकारी, टोमॅटो खट्टा, दही चाला, उडिया भात, चाकुली पिठा, डालमा, बडीचुरा या शाकाखारी व्यंजनांसह चिकन करी, फिश बेसरा ही मांसाहारी व्यंजन आणि चेन्नापोडा व रसगुल्लाही मिष्ठान्नही येथे खवय्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.