ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनांच्या सुमारे सव्वा लाख रिक्षा आणि 10 हजार टॅक्सी रस्त्यावर धावणार नाहीत
लाल बावटा रिक्षा संघटनाही बंद मध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबई : भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर आज (बुधवार, 3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बंदची घोषणा केली. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
“महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लोकांनी शांततेत बंद पाळावा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आम्ही कोणालाही आव्हान देत नाही आहोत, त्यामुळे प्रतिआव्हान म्हणून आम्ही शहर उघडतो, असं करु नये. हा बंद शांततेत पार पडावा, अशी आमची इतर संघटनांना विनंती आहे.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शाळा सुरु, स्कूल बस बंद
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशन घेतला आहे. बंदच्या काळात एखादी अनुचित घटना घडू शकते, त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी घेतला आहे.
शाळांना सुट्टी देण्यास मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे नियमित वेळेनुसार मुंबईतील शाळा सुरुच राहतील.
अकोला जिल्ह्यातील माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.