चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
यावर्षी गुलाबी बोंड अळीने कापसाच्या पिकावर थैमान घातले होते. परिणामी तालुर्सातील शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच या गुलाबी अळीच्या प्रकोपामुळे कापसाचे पिक हातात येत नसल्यामुळे त्रस्त होऊन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर रोटॅवेटर मारले. तर काहींनी कसेबसे कापसाचे पीक घेतले. मात्र कसेबसे पीक घेतलेल्या घरातील कापसाला आग लागुन ५० क्विंटल कापुस जळुन खाक झाला असुन यामध्ये जळका जगताप येथील शेतकऱ्याचे जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्तमाहितीनुसार, चांदुर रेल्वेवरून १२ कि. मी. अंतरावर असलेल्या जळका जगताप येथील शेतकरी अनीस खॉ रहीस खॉ पठान (वय-४२) यांनी आपल्या १५ एक्कर शेतामध्ये कापसाचे पीक पेरले होते. कसेबसे पीक हाती आल्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या घरात सदर कापुस वेचल्यानंतर ठेवला होता. रविवारी (ता. २८) रात्री अनीस खॉ मुलाबाळासह झोपलेले होते. सोमवारी (ता. २९) ला रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाजुला असलेली मुलगी साक्षी दुर्योधन ढोक ही लघुशंकेसाठी उठली असता तिला अनिस खॉ यांच्या कापुस ठेवलेल्या घरात आग लागलेली दिसली. त्यामुळे तिने तत्काळ अनीस खॉ यांना राहत्या घरातुन आवाज देऊन उठविले. त्यानंतर आसपासच्या घरातील सर्वच लोक जागे झाले होते. आग लागलेल्या घरात १०० क्विंटल कापुस ठेवला होता व त्या घरात कोणीच राहत नव्हते. घरातील कापसाला लागलेली आग अनीस खॉ यांनी गावकऱ्यांच्या मदतीने बुझविली. मात्र या आगीत त्यांचा ५० क्विंटल कापुस जळाला असुन जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झालेले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. कापुस ठेवलेल्या घरात एकही लाईट नाही. त्यामुळे सदर घटना शॉर्टसर्कीटमुळे नसुन ही आग कोणत्या तरी व्यक्तीने लावली असावी असा अंदाज गावकरी व्यक्त करीत आहे.