चांदूररेल्वे (शहेजाद खान )-
चांदूर रेल्वेवरून १७ कि. मी. अंतरावरील घुईखेड येथील जि.प. परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर यांच्याकडून आदिवासी विकास, ग्रामविकास, कृषी, महसूल, वन, आरोग्य, सहकार, वीज, सिंचन, शिक्षण, पोलीस, अन्न सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारी समाधान करण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज ७ मार्च रोजी घुईखेड येथे आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये किशोर तिवारी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवारण करणार आहे.
या करिता जिल्हा प्रशासन या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करणार आहे. यावेळी ग्रामीण घरकुल योजना, समाज मंदिर, युवा रोजगार, कौशल्य विकास, विविध विभागाच्या या भागातील वंचित व महिलांना देण्यात आलेला लाभ, पिण्याच्या पाण्याची समस्या आदी ग्रामीण समस्यांच्या तक्रारी निकाली काढण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या योजनांचा या भागातील आदिवासी, कोलाम व पारधी यांना मिळालेला लाभ, बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जमाफीच्या योजनांचा या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला लाभ याबाबत माहिती जाणून घेण्यात येेणार आहे. वन्य प्राण्याचा त्रासामुळे रोजगार गमावलेल्यांना नुकसानभरपाई, त्यांना गॅस जोडणी, वन रोजगार, तसेच घुईखेड जि. प. परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण, वीज जोडणी, वीज पुरवठा, जनतेच्या शिक्षणाच्या सवलती व लाभ, परिसरातील अवैध धंदे रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. .
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या भागातील वंचितांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल, कर्जमाफीपासून वंचित असलेल्या येथील शेतकऱ्यांची यादी, घुईखेड जि. प. परिसरातील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या समस्या जाणून घेण्या येण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..