चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
भारतातील जवळपास ५ हजार ५०० गाड्यांचे विविध स्टेशन थांब्याचे प्रस्ताव प्रलंबित आहे. एवढ्यातुनही चांदुर रेल्वे शहराला एकाच वेळी २ गाड्यांचे थांबे मिळाले, ते मिळाले केवळ आंदोलनाच्या माध्यमातुन. जनआंदोलनाशिवाय काहीच होत नाही. शहरात थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांची सोय होईल व रेल्वेचे सुध्दा उत्पन्न वाढेल. हा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचा असल्याचे प्रतिपादन सत्कारमुर्ती खासदार रामदास तडस यांनी केले. ते रेल रोको कृती समितीतर्फे आयोजीत रेल्वे थांब्यासाठी सहकार्य केल्याबद्दल व रेल्वे उड्डाणपुलासाठी मंजुरी मिळवुन दिल्याबद्दल नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलतांना खा. तडस म्हणाले की, स्व. डॉ. पांडुरंग ढोलेंनी सतत पाठपुरावा करत देवळीपासुन दिल्ली गाठले. पण आज दुख: वाटतंय की ते आपल्यात नाही. स्व. ढोलेंना विजयाचा दिवस पहायला मिळाला नाही याची खंत वाटते. मी आतापर्यंत लोकसभा मतदार संघात ६ गाड्यांचे थांबे मिळवुन दिले. परंतु रेल रोको कृती समिती सारखा माझा यथोचित सत्कार कुठेही केला नाही. त्यामुळे चांदुरवासीयांना या गाड्यांचं किती महत्व होतं ते यावरून दिसले असे खा. तडस म्हणाले. तसेच प्रस्तावनेतील मागणीवर बोलतांना म्हणाले की, पुणे करीता जाण्यासाठी काझीपेठ-पुणे या गाडीचा थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहो.
तसेच नवजीवन एक्सप्रेसचा थांबा मिळण्यासाठी आता नव्याने मागणी करणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. शहरात रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाणपुलाला मंजुरी मिळवून आणली असुन ते ही काम लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले. स्थानिक जुना मोटार स्टँड येथे रेल रोको कृती समितीतर्फे रविवारी सायंकाळी आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक तथा व्यापारी संघटनेचे मदन कोठारी होते. तसेच सत्कारमुर्ती खासदार रामदास तडस सुध्दा मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच प्रमुख पाहुने म्हणुन माजी आमदार अरूण अडसड, रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, मेहमुद हुसैन,डॉ. क्रांतिसागर ढोले, कॉ. विनोद जोशी, बंडुभाऊ यादव, रामदास कारमोरे, प्रा. विजय रोडगे, प्रताप अडसड आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.
सर्वप्रथम नितीन गवळी यांनी प्रस्ताविकेतुन म्हटले की, खासदार रामदास तडस यांनी रेल रोको कृती समितीला सहकार्य करून शहराला रेल्वे थांबा मिळवुन दिल्यामुळे आता प्रवाशांची होणारी गैरसोय टळत आहे. त्यामुळे अशा लोकप्रतिनीधींचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवीने आपले कर्तव्य आहे. तसेच या सोहळ्यातुन हक्काने खासदार रामदास तडस यांच्याकडे पुणे ला जाणारी एक रेल्वे गाडी व नवजीवन एक्सप्रेसचा थांबा शहरात मिळवुन देण्याची मागणी केली. तसेच रेल रोको कृती समितीच्या आंदोलनात अरूण अडसड यांचाही सहभाग असल्याचे सांगुन या विजयामध्ये त्यांचाही वाटा असल्याचे सांगितले. सामान्य जनतेसाठी असलेले शहरातील ग्रामिण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवुन देण्यासाठी अरूण अडसड यांनी प्रयत्न करण्याचेही आवाहन नितीन गवळींनी प्रास्ताविक मधुन केले. अरूण अडसड यांनी आपल्या भाषणातुन म्हटले की, प्रत्येकाचे विचार जरी वेगवेगळे असले तरी चांदुरचं भलं व्हावं असे सर्वांना वाटते. समाजाचा प्रश्न निर्माण होईल, समाजाच्या भल्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा मात्र सर्व राजकारण बाजुला ठेवून सर्वांनी कमर कसली पाहीजे. ती चांदूर रेल्वे वासीयांनी कसली म्हणुन हा विजयाचा दिवस पहावयास मिळाला. पक्षाच्या वेळी पक्ष करा, विचारांच्या वेळी विचारांसाठी भांडा, पण मतदार संघाच्या विकासाचा प्रश्न येईल तेव्हा मात्र आपल्यातला माणुस जागा ठेवण्याचे आवाहन अरूण अडसड यांनी केले. तसेच शहरात उपजिल्हा रूग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. यावेळी खासदार रामदास तडस यांचा शाल, श्रीफळ, हार घालुन यथोचित सत्कार फटाकांच्या आतषबाजीत रेल रोको कृती समितीतर्फे करण्यात आला. यानंतर अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना, चांदुर रेल्वेतर्फे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांचा सुध्दा सत्कार रेल रोको कृती समितीच्या वतीने यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, मेहमुद हुसैन, कॉ. विनोद जोशी, डॉ. क्रांतिसागर ढोले, शेख हसनभाई, कॉ. विजय रोडगे, संजय डगवार, गौतम जवंजाळ, भिमराव खलाटे, महादेवराव शेंद्रे, रामदास कारमोरे, भिमराव बेराड, अजय चुने, विनोद लहाने,कमलकिशोर पनपालीया, मनोज महाजन, पंकज गुडधे, प्रसेनजित तेलंग, अंबादास हरणे, अवधुत सोनवने, अशोक हांडे, श्याम भेंडकर, रोशन जयसिंगपुरे, अरूण बेलसरे, बंडुभाऊ यादव, निलेश कापसे, साहेबराव शेळके, गौरव सव्वालाखे, चेतन भोले, चंदु बगाडे, प्रमोद बिजवे, मंगेश डाफ, सुधीर सव्वालाखे, अजमत खान, गोपाल मुरायते, संदिप जळीत आदींनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सुत्रबध्द संचलन प्रा. प्रसेनजित तेलंग यांनी तर आभार प्रदर्शन संजय डगवार यांनी केले. यावेळी रेल रोको कृती समितीचे सदस्य, तालुकावासी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
मेहमुद हुसेन यांनी कॉंग्रेसवर डागली तोफ
रेल रोको कृती समितीचे सदस्य मेहमुद हुसेन यांनी आपल्या भाषणातुन कॉंग्रेसवर तोफ डागली. ६० वर्षांत कॉंग्रेसने अन्याय केला असुन मुस्लीमांनी आता जागे होण्याचे आवाहन केले. यासोबतच स्थानिक आमदारांवर सुध्दा कोणतेही काम करीत नसल्याचे टिकास्त्र सोडले. त्यांच्या या विस्पोटक भाषणाने कार्यक्रमात एक वेगळाच माहोल तयार झाला होता. तसेच त्यांनी खासदार रामदास तडस व आनंदराव अडसुळ यांचे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.