बीड जिल्ह्याला अवकाळी पाउस आणि गारपीटीने झोडपले
प्रतिनिधी: दिपक गित्ते व नितीन ढाकणे
बीड : बुधवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह बीड जिल्ह्यात हजेरी लावत बहुतांशी तालुक्यांना झोडपले. बीड शहरासहित तालुका, गेवराई, केज, माजलगाव, अंबाजोगाई या तालुक्यातील काही गावात काही ठिकाणी गारपीट झाली तर कुठे मध्यम तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. किल्लेधारूरमध्ये तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतीतील कामे ठप्प झाली, तर रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील चार दिवसापासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. बुधवारी दुपारी वातावरणात अचानक बाद होऊन अवकाळी पावसाला सुरुवात झाली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हा शिडकावा दिलासा देणारा असला, तरी या पावसामुळे रब्बी पिके, फळबागा व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
वीज कोसळून चार शेळ्या ठार
दरम्यान, बुधवारी दुपारी माजलगाव तालुक्यात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. यावेळी शेतात वीज कोसळल्याने तालुक्यातील पिंपळगाव ना. येथील बबन अर्जुन सुरवसे यांच्या मालकीच्या चार शेळ्या ठार झाल्याने त्यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे.