परळी वैजनाथ नगर परिषदेत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
पुरस्कारात महापुरुषांच्या कार्याचे मूल्यमापन करणे अशक्य : मुख्याधिकारी डॉ. बी. डी. बिक्कड
परळी वै (प्रतिनिधी) दिपक गित्ते व नितीन ढाकणे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज येथील नगर परिषदेत उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी “भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे बाबासाहेब हे जगाला नवीन दिशा देणारे व्यक्तिमत्व होते. त्यांचा अर्थकारण, जल व्यवस्थापन तसेच कायदा आदी विषयांवरचा सखोल अभ्यास भारताचे भविष्य सकारात्मरित्या बदलणारा ठरला” असे प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. बी. डी. बिक्कड यांनी केले.
यावेळी डॉ. बिक्कड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओघवत्या शैलीत जीवन चरित्र सांगितले. डॉ. बिक्कड यांच्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, आर्थिक, परराष्ट्रीय धोरण आदी विषयांच्या योगदानाचे महत्त्व विषद केले. “मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे असे मानणारे डॉ. आंबेडकर यांचे विचार कालातीत आहेत, तसेच पुरस्कारात महापुरुषांच्या कार्याचे मूल्यमापन करणे अशक्य आहे असेही मुख्याधिकारी डॉ. बी. डी. बिक्कड म्हणाले.
“आजच्या युगात बाबासाहेबांचे विचार जो अनुसरेल त्या व्यक्तीचे कल्याण तर होईलच सोबत समाजाच्या प्रगतीसाठी ती व्यक्ती निश्चितच योगदान देईल” असा विश्वास नगर परिषदेचे सदस्य संजय फड यांनी व्यक्त केला.
“जगाला शांतीचा संदेश देणारे, आरक्षणरुपी प्रगतीचे साधन देणारे डॉ. बाबासाहेब यांचे विचार अवलंब करणारे अधिकाधिक लोकप्रतिनिधी निर्माण होतील त्यावेळी भारत महासत्ता बनेल” असे प्रतिपादन जेष्ठ विधिज्ञ डी. एल. उजगरे यांनी केले.
कार्यक्रमचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नगर परिषदेचे सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी केले. यावेळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक वामनराव जाधव, स्वच्छता निरीक्षक श्रावण घाटे, लेखापाल सुदाम नरवडे,सचिन देशमुख, सिद्धेश्वर घोंगडे,विशाल पाठक, शंकर साळवे,विजय कांबळे, दत्ताभाऊ देशमुख, शेख जमिल, कपील जगतकर, संजय जुजगर, शरणम ताटे, आशिष दिक्षीत, भगवान कसबे, सुमेध नरवडे, विशाल विभूते, बालाजी कारले, किरण उपाडे,गौतम वाघमारे आदी कर्मचारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.