मध्यप्रदेशातील भाजपचे मंत्री गोपाळ भार्गव यांचे विधान
भोपाळ – जेव्हा ४० टक्केवाल्याला ९० टक्क्याच्या आधी स्थान दिले जाते, तेव्हा देश मागे पडू लागतो. जे राष्ट्रासाठी घातक आहे. हा ब्राह्मणांचा नव्हे, तर प्रतिभेचा अपमान आहे, असे वक्तव्य मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री गोपाळ भार्गव यांनी केले. ‘आरक्षणामुळे देश शक्तीहीन होतो. प्रतिभेच्या आधारावर आरक्षण देण्यात यावे’, असेही ते म्हणाले. मध्यप्रदेशातील नरसिंहपूर येथे परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाज मेळाव्यात ते बोलत होते. भार्गव यांचे वक्तव्य प्रसारित झाल्यावर त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हटले आहे. ‘मी आरक्षणाचा आदर करतो. माझ्या भाषणात कुठेही ‘आरक्षण’ असा शब्द नव्हता’, असा खुलासा त्यांनी केला. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सुरेश पचौरी हेही उपस्थित होते.
भार्गव भाषणामध्ये पुढे म्हणाले होते की, जेव्हा देश स्वतंत्र झाला होता, तेव्हा एक चतुर्थांश खासदार-आमदार, कर्मचारी, अधिकारी आपल्या (ब्राह्मण) समाजाचे होते. आता हा आकडा केवळ १० टक्के इतकाच राहिला आहे. दिवसेंदिवस ही संख्या न्यून होत आहे. याचे कारण पूर्वी नीती होती आणि आता अनीती आहे. प्रत्येक पक्षाला ब्राह्मणांचे समर्थन हवे आहे; पण त्यांना द्यायचे तर काहीच नाही. आज आपण फक्त मतपेढी झालो आहोत. पूर्वी जशा इतर जाती होत्या, तशी आपली अवस्था झाली आहे. ब्राह्मणांनी सरकारकडे काही मागणी केलेली नाही.