निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राज्यातील सहा विधान परिषद मतदारसंघांमध्ये शुक्रवारपासून (२० एप्रिल) आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील विधान परिषद मतदारसंघासाठी २१ मे २०१८ रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार असून, आचारसंहिता लागू झाली आहे.
नाशिकमधील विधान परिषदेचे आमदार जयवंत जाधव यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अन्य विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळही ३१ मे २०१८ पर्यंत पूर्ण होणार असून, या जागांसाठी निवडणूकप्रक्रिया राबवावी लागणार आहे. आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. अर्ज भरण्यासाठी ३ मेपर्यंत मुदत देण्यात आली असून, ४ मे रोजी अर्ज छाननी होणार आहे. ७ मे ही अर्जमाघारीची तारीख आहे. २१ मे रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार असून, २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. २९ मेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहील.