मांजरखेडच्या सरपंचाला जिवे मारण्याची धमकी – पोलीस हत्या प्रकरणातील प्रकार >< पुन्हा तिसऱ्या प्रकरणाची भर

0
906
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
      चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील बंजारा तांडा परिसरात अवैध गावठी दारू उद्ध्वस्त करून परत निघत असतांना चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. याच प्रकरणातील आरोपींच्या घरची तपासणी करण्याकरीता मंगळवारी पोलीसांची चमु गेली असता त्यांच्या घरून हरिणवर्गीय प्राण्याचे खुरे व मास आढळून आले आहे.  हत्या प्रकरणासोबतच दुसऱ्या प्रकरणात भर पडली होती. परंतु हे येथेच थांबले नाही. या प्रकरणात पुन्हा तिसऱ्या प्रकरणाची भर पडली असुन पोलीस हत्याप्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांकडुन मांजरखेड कसबा येथील सरपंचाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
       चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील बंजारा तांड्यावर  एका शेतशिवारातील गावठी दारू अड्डा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव कवडुजी जाधव (५५) व शिपाई सतीश शरद मडावी (४१) यांनी उद्ध्वस्त केला. उद्ध्वस्त केल्यानंतर जाधव यांच्या अॅवेंजर दुचाकीने पोलीस स्टेशनकडे परत जाण्यासाठी निघाले असता त्याच ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी दारू विक्रेत्यांच्या मारहाणीत खाली कोसळलेल्या सतीश मडावी यांच्या डोक्यावर दगडाने जबर प्रहार करण्यात आला. यामध्ये मडावी यांचा जागीच मृत्यु झाला असुन जाधव गंभीररित्या जखमी झाले आहे. जाधव यांच्यावर गेट लाईफ हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. अशातच मंगळवारी दुपारी पोलीसांची चमु आरोपींच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी मांजरखेड येथील तांडा परिसरात गेली असता आरोपींच्या घरून ४ पाय (खुरे) व मास आढळून आले. त्यामुळे या हत्या प्रकरणात दुसऱ्या प्रकरणाची भर पडली होती. हे येथेच न थांबता आता तिसऱ्या प्रकरणाची भर यामध्ये पडली आहे. पोलीस हत्येच्या दिवशी प्रथम नागरीक या नात्याने मांजरखेड येथील सरपंच दिलीप नारायणराव गुल्हाने (५३) हे ठाणेदार शेळके यांच्यासमवेत घटनास्थळ दाखविण्यासाठी गेले होते. त्यामुळे पोलीसांना या प्रकरणाबाबत माहिती का दिली म्हणुन आरोपी दिलीप शालीकराम राठोड रा. मांजरखेड तांडा याने फिर्यादी दिलीप गुल्हाने यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीसांत दिली. पोलीसांनी आरोपी दिलीप राठोड विरूध्द कलम १९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यामुळे पोलीसांना हत्या प्रकरणात आता एकुण तीन प्रकरणांचा तपास करावा लागणार आहे.