दीपप्रज्वलन करतांना डावीकडून अधिवक्ता गोविंद के. भरतन्, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, अधिवक्ता हरि शंकर जैन, अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी
सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन अंतर्गत राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशन
अधिवक्त्यांचा इतिहास हा पुरातन आणि आध्यात्मिक आहे. लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक अधिवक्त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेऊन एक आदर्श निर्माण केला. तोच आदर्श घेऊन धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतल्यास इतिहासात त्याची सुवर्णाक्षरात नोंद होईल. येथे जमलेल्या अधिवक्त्यांनी केवळ प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे अपेक्षित नसून, प्रवाहाची दिशा पालटून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची व्यवस्था निर्माण करायला हवी, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, हिंदुत्वनिष्ठांना कायद्याची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांना हिंदुत्वाचे कार्य करतांना वेळोवेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी हिंदुत्वनिष्ठांना धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करून साहाय्य करावे.
अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. दीपप्रज्वलनानंतर सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी वेदमंत्राचे पठण केले. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन समितीचे पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले.