रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनारी पोहायला उतरलेल्या ५ पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. हे सर्व पर्यटक मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी आहेत. हे सर्व पर्यटक गणपती पुळेला जात होते. आरेवारे समुद्र पाहायला आलेल्या या पर्यटकांचा पोहायला उतरल्याने मृत्यू झाला. या सर्व पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
बोरिवलीतील डिसुझा कुटूंबीय हे मुंबईतून गणपती पुळेला फिरण्यासाठी गेले होते. गणपती पुळेला जाण्याआधी त्यांनी रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्याला भेट दिली. या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना पोहण्याचा मोह झाला. सहा पर्यटकांपैकी ५ जण समुद्रात उतरले. स्थानिक नागरिकांनी त्यांना समुद्रात उतरू नका असा सल्ला दिला. ज्या ठिकाणी तुम्ही पोहोयला उतरत आहात तो भाग अत्यंत खोल आहे, असं सांगूनही स्थानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून हे पर्यटक समुद्रात उतरले. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यात त्यांना यश आले नाही आणि पाचही जणांचा मृत्यू झाला.