सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाअंतर्गत हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशन
रामनाथी (गोवा) – हिंदु समाज हा एक योद्धा समाज होता, आहे आणि राहील. वर्ष 1878मध्ये इंग्रजांनी भारतीय शस्त्रास्त्र कायदा करून भारतियांना शस्त्रविहीन केले. शस्त्र बाळगणे, हा अपराध ठरवला. या कायद्यानंतर ज्यांनी अहिंसेचे व्रत धारण केले, त्या मोहनदास गांधी यांनी इंग्रजांनी शस्त्रास्त्र कायदा केल्याने मी त्यांना कदापिही क्षमा करणार नाही, असे म्हटले होते. भारतात प्राचीन काळापासून भारताकडे सैन्यदल होते. त्या वेळीही अनेकांनी स्वतःचे शौर्यजागर करून व्हिक्टोरिया क्रॉस हे सन्मानाचे पदक मिळवले होते. यातूनच भारतीय समाज हा योद्धा समाज होता, हेच आपल्याला दिसून येईल. त्यामुळे शौर्यजागरण करण्यासाठी वीररसयुक्त गीतांचे गायन, तसेच शाळांमधून सैनिकी शिक्षण बंधनकारक करणे आवश्यक आहे. जेव्हा हिंदूंमध्ये शौर्यजागर होईल,तेव्हा हिंदूंचा विजय सुनिश्चित असेल, असे प्रतिपादन वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदु विद्या केंद्राच्या माजी संचालिका प्रा. कुसुमलता केडिया यांनी केले. सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाअंतर्गत हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशनाचे आयोजन येथील श्री रामनाथ देवस्थानमधील श्री विद्याधिराज सभागृहात 9 ते12 जून या कालावधीत चालू आहे. त्यामध्ये प्रा.केडिया यांनी भारताच्या शौर्याचा इतिहास आणि शौर्यजागरणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. या अधिवेशनाला देशभरातील 13राज्यांतून 240 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
या अधिवेशनात मध्यप्रदेश येथील धर्मपाल पिठाचे संचालक आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सल्लागार प्रा. रामेश्वर मिश्र, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.)चारुदत्त पिंगळे, समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर आदींसह अन्य वक्त्यांनी धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. या वेळी धर्मप्रेमींना चांगले संघटक निर्माण करणे,धर्मबंधूभाव निर्माण करणे, समविचारी कर्महिंदूंचे संघटन कसे करावे करावेे ?, हिंदूंमध्ये जागृती कशी निर्माण करावी ?, हिंदूंना संघटित करण्यासाठी कोणते उपक्रम राबवावेे ? याविषयी प्रशिक्षण दिले जात आहे.
एखाद्या व्यक्तीकडून झालेल्या चुकीबद्दल संपूर्ण जातीला दोषी ठरवणे अत्यंत चुकीचे ! – प्रा. रामेश्वर मिश्र
जातीव्यवस्था योग्य आहे कि अयोग्य हा प्रश्नच हास्यास्पद असून कुलसमूह म्हणजे जाती !या कुळांचे काही व्यवसाय निश्चित झाले होते.आता तशी व्यवस्था नाही. कोणीही कुठलाही व्यवसाय करू शकतो. जर ही व्यवस्थाच नाही, तर जातीव्यवस्था अस्तित्वात कुठे आहे ?धर्मशास्त्रांमध्ये तर जात नावाचा शब्दच नाही.जातींमध्ये उच्च–नीच असे मानणे, हे सर्वथा अयोग्य आहे. जातीव्यवस्था सर्वत्रच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे. पूर्वजांकडून काही अनुचित झाले असेल, तर ती व्यक्तीगत चूक आहे.त्यासाठी संपूर्ण जातीसमूहाला दोषी ठरवणे अयोग्य आहे, असे प्रतिपादन मध्यप्रदेश येथील धर्मपाल पिठाचे संचालक आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सल्लागार प्रा. रामेश्वर मिश्र यांनी जातीव्यवस्थेच्या संदर्भात पसरवले गेलेले भ्रम आणि वस्तूस्थिती याविषयी बोलतांना केले.
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी समविचारी धर्मनिष्ठ हिंदूंचे संघटन अपेक्षित ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी देशभर हिंदूंच्या संघटनाचे कार्य करतांना समविचारी धर्मनिष्ठ हिंदूंचे संघटन अपेक्षित आहे. बहुसंख्य हिंदूंपैकी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने प्राधान्याने समविचारी असलेल्या धर्मनिष्ठ हिंदूंचे संघटन आपण करायला हवे. हिंदु राष्ट्र-संघटक बनून हे कार्य कसे करायचे, हे या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनातून शिकून पुढे हिंदूंचे संघटन करूया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशनात निश्चित केलेला समान कृती कार्यक्रम !
या अधिवेशनामध्ये उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी समाजात जागृती करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृतीचे उपक्रम देशभर राबवण्याचा निर्धार केला. त्या अंतर्गत देशभरामध्ये छोट्या, मध्यम आणि मोठ्या हिंदु धर्मजागृती सभा, तसेच एक वक्ता अशा 290 ठिकाणी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. याचसमवेत 957 ठिकाणी ग्रामस्तरीय हिंदु राष्ट्र-जागृती बैठकांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले.