अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकरी कर्ज माफीबाबत शासनाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा अपेक्षित कार्यवाही न झाल्यामुळे अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री.अभिजित बांगर यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवून बँक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे धाडस दाखविले, त्यांच्या कर्तबगारीचा सन्मान म्हणून शेतकऱ्यांच्यावतीने मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार डॉ. अनिलजी बोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मोर्शीच्या नगराध्यक्षा शिला रोडे, उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, प्रा.दिनेश शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा कुणी हि वाली नाही, असे बोलल्या जाते, मात्र त्याला अपवाद म्हणून किमान शेतकरी पुत्र अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा, असा व्यापक व शेतकरी हिताची विचारसरणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या या निर्णयातून पाहायला मिळाली.
मोर्शी – वरुड मतदार संघाचे आमदार आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या सूचनेवरून बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अनावश्यक दाखल्यांचा तगादा न लावणे, त्याचबरोबर बँकेच्या दर्शनीय भागावर आवश्यक कागद पत्रांच्या सूचीचे फलक लावणे, व पीक कर्ज वितरणाची टक्केवारी वाढविणे, तथा शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाकरिता जिल्हा पातळीवर हेल्पलाईन सुरू करणे, यासोबतच शेतकऱ्यांना बँक अधिकाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक देणे याबाबत जिल्हाधिकारी बांगर यांनी बँक अधिकाऱ्यांना असे निर्देशित केले.