जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची आढावा बैठक संपन्न – आ. जगताप यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर अपुर्ण कामे त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश

0
1044
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 

चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीनही तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध कामांचा सोमवारी (ता. ३०) सायंकाळी ४ वाजता आमदार वीरेंद्र जगताप यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा घेतला असता अधिकाऱ्यांना धारेवर धरत अपुर्ण कामे त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश दिले.

जलयुक्त शिवार अंतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये सुरू असलेली कामे अपुर्ण असल्याने आ. जगताप यांनी गाव निहाय आढावा घेतला. या आढावा बैठकीत तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवर  आ. जगताप अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड, बग्गी, दहिगाव धावडे, कोहळा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिलोडा या गावात जलयुक्त शिवारचे कामे सुरू असतांना शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे रस्ते बंद पडल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अशा तक्रारी आ. जगताप यांच्याकडे आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील एकही रस्ता बंद न करता कामे करा असे सक्त निर्देश यावेळी आमदारांनी दिले. जलशिवारची कामे ज्या ज्या गावात सुरू करतांना त्या स्थानिक गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी यांना लेखी माहिती द्यावी व नंतरच कामे सुरू करावी असा ठरावही करण्यात आला. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम येथे धानोरी, राईगुई व खालाड नदीचे संगम आहे. तेथील पाण्याचा प्रवाह पाहता भिलटेक ते तीनही नद्यांच्या संगम पर्यंत नदी खोलीकरणाचे कामाला गती देण्याचेही निर्देश दिले. टेंभुर्णी येथील पाण्याचा साठवण तलाव या कामालासुध्दा प्रशासकीय मान्यता देण्याचे सांगितले. सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर स्वत: जाऊन नवीन प्रस्तावीत कामाचे अंदाजपत्रक तयार करावे व त्याला त्वरीत मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले. पळसखेड येथील जि. प. यंत्रनेतंर्गत जल शिवारची अपुर्ण असलेली दोन कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. पोहरा, चिरोडी वनक्षेत्र कमी होत असल्याचे दिसून आल्याने तेथील वन्यप्राणी तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे, त्यासाठी वनविभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे सांगितले. तसेच चिरोडी, बासलापुर वनपरिक्षेत्रात वृक्षलागवड ही अधिक प्रमाणात करावी, शक्यतोवर ५ फुटाच्या उंचीची झाडे लावावी अशा सुचना देण्यात आल्या. याचसोबत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झाडे लावण्यासाठी वनविभागाने झाडे उपलब्ध करून द्यावी व विद्यार्थ्यांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, चांदूर रेल्वेचे तहसिलदार बी. एन. राठोड, धामणगावचे तहसिलदार राम लंके यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आमदारांनी वनविभागाला फटकारले

चिरोडी कडील जंगल वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ओस पडले आहे. जंगलातील अनेक झाडे नष्ट झाली आहे. यामुळे आमदार वनविभागावर संतप्त होऊन अधिकाऱ्यांना आडवे हात घेऊन चांगलेच फटकारले. वनविभागातर्फे ४०० झाडे लावल्याचे सांगितल्यानंतर ऐवळ्या मोजक्या झाडात काय होणार ? असा सवाल आ. जगताप यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला होता.

५७ गावात पुन्हा जलशिवार कामे

चांदूर रेल्वे, नांदगाव व धामणगाव या तीन तालुक्यातील ५७ गावांची नव्याने जलशिवारच्या कामांसाठी निवड करण्यात आली. या गावामध्ये एकुण ६८० कामे प्रस्तावित असून या सर्व कामांचे अंदाजपत्रक संबंधित अधिकाऱ्यांनी तयार करून प्रशासकीय मान्यता घेण्याचे सुचविले.