गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी ९ सहस्रांहून अधिक हिंदूंचा जनआक्रोश मोर्चा !

0
1076

 

नालासोपारा, १ – वैभव राऊत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणार्‍या आतंकवादविरोधी पथकाचा निषेध असो, ‘वैभव राऊत निर्दोष आहेत’, ‘वन्दे मातरम्’, ‘भारतमातेचा विजय’, ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ अशा घोषणा देत १७ ऑगस्ट या दिवशी ९ सहस्रांहून अधिक लोकांनी गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना पाठिंबा दर्शवला. गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना स्फोटके बाळगल्याच्या कथित गुन्ह्याखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे श्री. राऊत यांच्या समर्थनासाठी या मोर्च्यामध्ये सहस्रोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या. ‘निर्दोष श्री. वैभव राऊत यांची मुक्तता न केल्यास यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू’, अशी चेतावणी या जनआक्रोश आंदोलनात जनसमुदायाने पोलीस आणि प्रशासन यांना दिली. मोर्च्यातील प्रत्येक आंदोलक ‘श्री. राऊत निर्दोष असून त्यांची मुक्तता करा’, यासाठी पोटतिडकीने घोषणा देत होता. आंदोलनकर्त्यांकडून हाताला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. संपूर्ण नालासोपारा भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. थोड्या थोड्या अंतरावर पोलिसांचा फौजफाटा उभा होता. आंदोलनस्थळी दंगल नियंत्रण पथकाचे पोलीसही उपस्थित होते. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि आगरी समाज यांनी मोर्च्याच्या वेळी गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे घोषित केले.

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्री. शिरीष चव्हाण, इस्कॉन संप्रदायाचे अखिल भारतीय गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. दामोदरदास, आगरी समाजाचे श्री. जनार्दन पाटील (मामा), शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. हर्षद राऊत, शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक श्री. प्रवीण म्हाप्रळकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवकुमार पांडे, लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार, अधिवक्ता खुश खंडेलवाल, भाजपचे श्री. संदीप सिंह, भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, भाजपच्या उत्तर भारतीय समाजाचे पालघर जिल्हा सचिव श्री. नरेंद्र पाठक यांसह मोठ्या प्रमाणात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आणि स्थानिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्च्यात सहभागी संघटना

आगरी सेना, भंडारी समाज, लष्कर-ए-हिंद, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अखिल भारतीय भंडारी समाज, वसई, विरार, नालासोपारा येथील स्थानिक नागरिक, तसेच पालघर, रामनाथ (अलिबाग) येथूनही नागरिक सहभागी झाले होते