पत्नीच्या प्रेतासोबत पतीचा दोन दिवस घरातच मुलाबाळासह मुक्काम ; उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबेतडवळे येथील घटना

0
2143

उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील राजश्री विनायक खारगे या पंचवीस वर्षीय विवाहितेचा तिच्या राहत्या घरात सोमवारी (दि८) सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. प्रेताची दुर्गंधी सुटल्याने पती विनायकनेच सोमवारी भल्या सकाळी शेजाऱ्यांना भेटून ही घटना सांगितली.दरम्यान राजश्रीची चार वर्षांची मुलगी ईश्वरी ही दोन दिवसांपासून गल्लीत फिरून माझी आई आजारी आहे आणि तिला मुंग्या लागल्या आहेत असे सांगत होती. त्यामुळे याबाबत गावात हत्या की आत्महत्या? या चर्चेला उधाण आले आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी की उस्मानाबाद येथील माहेर असलेल्या राजश्रीचा आठ वर्षांपूर्वी तडवळे येथील विनायक खारगे यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना ईश्वरी (४वर्षे) व युवराज (२वर्षे) ही दोन मुले आहेत .लग्नानंतर प्रचंड व्यसनी बनलेला विनायक घरी आई आणि बायको बरोबर नेहमी वाद घालत असे. त्याला कंटाळून वर्षभरापूर्वी आई देखील पुणे येथे रहायला गेली त्यामुळे घरी पती पत्नी आणि दोन मुले राहात असत. मागील चार पाच दिवसांपासून राज्यश्री घराबाहेर दिसली नसल्याचे शेजारी सांगतात परंतु राजश्रीची चार वर्षांची चिमुकली ईश्वरी मात्र दोन दिवसांपासून गल्लीतील काही ठिकाणी माझी आई आजारी आहे आणि तिला मुंग्या लागल्या आहेत अशी सांगत होती परंतु त्याकडे कोणाचे विशेष लक्ष गेले नाही .सोमवारी सकाळी राजश्रीच्या प्रेताचा प्रचंड दुर्गंध येऊ लागल्याने पती विनायकनेच सकाळी सहा वाजता शेजाऱ्यांना भेटून राजश्रीने फाशी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी रमेश खारगे यांनी दिलेल्या खबरीवरून ढोकी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पती विनायकला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गावात मात्र याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे.

ठळक मुद्दे
१) पत्नी राजश्रीचे प्रेत घरात ठेवुन पती विनायक दोन मुलासह घरात निवांत राहिला.
२) आईलाही पुण्याला फोन करुन सांगीतली होती घटना.