अयोध्या – सरकारची ‘मंदिर वही बनाऐंगे, पर तारीख नही बताऐंगे’, अशी दुटप्पी भूमिका आहे; मात्र आता सरकारने राममंदिर उभारण्याचा दिनांक सांगितलाच पाहिजे, अशी परखड मागणी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारकडे केली. अयोध्येत राममंदिर व्हावे, अशी देशातील प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. आता हिंदू शांत बसणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. साधू-महंतांसमवेत झालेल्या भेटीनंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. श्री. ठाकरे पुढे म्हणाले, ‘ कुंभकर्ण ६ मास झोपतो आणि ६ मास जागा रहातो; पण सध्याचा कुंभकर्ण (केंद्र सरकार) गेल्या ४ वर्षांपासून झोपलेला आहे. त्याला जागे करण्यासाठी मी आलो आहे. आधीच्या सरकारकडून राममंदिर बांधले जाण्याची अपेक्षाच नव्हती; परंतु सध्याच्या सरकारने ते उभारावे. राममंदिरासाठी कायदा केला, तर त्याला शिवसेनेचे खासदार पाठिंबा देतील.’’