आकोट/ संतोष विणके
काँग्रेसने कधीच गरिबांची थट्टा केली नाही तर महाराष्ट्रासह देशातल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं मात्र या घोषणा बाज सरकारने एकाही आश्वासनांची पूर्ती केली नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात कधीच कुणाला लाईनीत लागायची वेळ आली नाही या सरकारने मात्र व्यापारी गरीब शेतकरी बेरोजगार सगळ्यांना लाईनीत उभे केले.सतत घोषणा देणाऱ्या या सरकारची एकही आश्वासनपूर्ती नाही असे विचार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल आकोट येथे कांग्रेसच्या जनसंघर्ष यात्रे निमित्य आयोजित जाहीर सभेत बोलतांना केले
.पुढे बोलताना ते म्हणाले थट्टा करणारे खोटं बोलणारे हे सरकार आता नको आहे. अब की बार… बस कर यार….! या सरकारला शेतकरी व्यापारी बेरोजगार गरीब जनता सगळे कंटाळले आहेत त्यामुळे जनतेला आता मन की बात नाही काम की बात ऐकायची आहे.राज्यात 11 हजाराहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या तर देशात पन्नास हजार पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना हे सरकार करते तरी काय…? जनता या सर्वांना कंटाळली असून महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर येणार आहे,जाहीर सभे पूर्वी जन संघर्षयात्रेचे शहरातील प्रमुख मार्ग शिवाजी चौक,सोनु चौक, जयस्तंभ चौक, मार्गे मार्गक्रमण झाले.वाटेत अनेकांनी यात्रेचे स्वागत केले .
यात्रेच्या अग्रक्रमावर प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशिष देशमुख यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी हजर होते.यानंतर जनसंघर्ष यात्रे निमित्त आयोजित जाहीर सभेला मंचावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेत राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते महेश गणगणे, रामदास बोडखे,हीदायत पटेल, यांच्यासह इतरांची भाषणे झाली. तर अनेकांनी यावेळी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला तर काहींना नियुक्तीपत्र देण्यात आले. जाहीर सभेला काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य जनतेची उपस्थिती होती.