आर्केस्ट्रासाठी बग्गी येथील चवाळे कुटुंबीयांनी नि:शुल्क दिला संच
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांच्या वाहनावर करण्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्याचे पडसाद अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात देखील उमटले. या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शहरातील सोमवारी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. व यानंतर चौकात देशभक्तीपर गीतांचा आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता.
पुलवामा गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. तसेच सोमवारी पहाटे दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी नापाक कृत्य केलं व पुलवाम्यातील पिंगलान भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण आलं. या हल्ल्याचा निषेध सर्वत्र केला जात असून चांदूर रेल्वे शहरासह सुध्दात याची प्रतिक्रीया पहावयास मिळाली. यात सोमवारी चांदूर रेल्वे शहर कडकडीत बंद पाडण्यात आला होता. सर्व पक्षीय, सामाजीक संघटना, धार्मिक संघटना, व्यापारी संघटनांतर्फे आझाद पुतळ्यापासुन ते जुना मोटार स्टँड पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. यानंतर चौकात श्रध्दांजली वाहण्यात वाहुन राष्ट्रगीत गायण्यात आले. यादरम्यान आयोजित कार्यक्रमात माजी जि.प. सदस्य प्रविण घुईखेडकर, निलेश विश्वकर्मा, राजेश निस्ताने, छोटूभाऊ विश्वकर्मा, बच्चु वानरे, अभिजीत तिवारी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्रम्हकुमारीज प्रजापिता येथील दिदि, डॉ. सुषमा खंडार यांचीही उपस्थिती होती. यानंतर शहरात जुना मोटार स्टँड येथे देशभक्तीपर गीतांचा आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या आर्केस्ट्रासाठी संपुर्ण वाद्य संच तालुक्यातील बग्गी येथील चवाळे कुटुंबीयांनी नि:शुल्क उपलब्ध करून देत स्वत:च संच हाताळून एकप्रकारे नि:शुल्क सेवा दिली. यावेळी प्रकाश चवाळे, विजया चवाळे, चाणक्य चवाळे यांसह काही शहरवासीयांनी देशभक्तीपर गीत प्रस्तुत केले. बंदमुळे शहरात सर्वत्र शांतता होती व पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता.