पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुऱ्हाड; सावळज मधील प्रकार

0
755

पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुऱ्हाड; सावळज मधील प्रकार

तासगांव : मिलिंद पोळ

दुष्काळाच्या तीव्र झळा आता प्रत्यक्षात पोहचु लागल्याचे चित्र तासगाव तालुक्यातील सावळज मध्ये दिसु लागले आहे. पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची दुर्दैवी वेळ सावळज (ता.तासगांव) येथील दत्तात्रय संभाजी माळी या शेतकऱ्यावर आली आहे. यंदाच्या दुष्काळी परीस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पाण्याअभावी द्राक्षबागाच नुकसान व चाऱ्या अभावी मुक्या जनावरांची होणारी तडफड हे सर्व दिवसेंदिवस आणखी भयावह होताना जाणवु लागले आहे.

सावळज परीसरात सध्या पाण्यासाठी सर्वत्र वणवण सुरुच आहे. काही भागात गावापासून १० किलोमीटर अंतावरील म्हैसाळ योजनेच्या बंधाऱ्यातुन शेतकऱ्यांनी पाण्याची सोय केली आहे. परंतु ते पाणी आणणे सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यंदा पाऊस समाधानकारक न झालेमुळे सावळजपुर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी टॅंकरने पाणी घालून द्राक्षबागा जगवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दत्तात्रय माळी या शेतकऱ्याच्या बागेला यंदाच्या हंगामात पाण्याअभावी पीकही कमी आले होते.ते अल्प पीक टॅंकरच्या पाण्याने जगवणे अशक्यप्राय व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे दुर्दैवाने त्य शेतकऱ्याला त्या बागेवर कुऱ्हाड चालवावी लागत आहे.

अग्रणी नदीला मध्यंतरी पुणदी योजनेचे पाणी सोडण्यात आले होते परंतु हे पाणी ठराविक अंतरापुढे न गेल्यामुळे बहुतांश शेतकरी पाण्यापासून वंचित राहीले. सावळजसह डोंगरसोनी गावाची परीस्थितीही अशीच भयावह आहे. त्या गावातील शेतकऱ्यांनी ४० ट्क्के द्राक्षबागांची यंदा पीकछाटणीच घेतली नाही. ज्या बागा सध्या आहेत त्या बहुतांश बागांसाठी टॅंकरनेच पाणीपुरवठा केला जातो आहे. द्राक्षशेती यंदा पाण्यामुळे अडचणीत आली आहे.

पाण्यासाठी झगडणाऱ्या शेतकऱ्याला द्राक्षाच्या घसरेल्या दरामुळे चांगलाच धसका बसला आहे. एकीकडे विकत पाणी घालून बागा जगवायच्या आणि नंतर पीकाला दर नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकत चालला आहे. पाण्याअभावी द्राक्षबागा काढण्याची दुर्देवी सुरुवात सावळजधुन झाली आहे. राजकीय फसव्या आश्वासनांवर आता शेतकरी विश्वास ठेवायला तयार नाही. प्रत्यक्ष शाश्वत व हक्काच पाणी जोपर्यंत सावळज भागाला मिळत नाही.तोपर्यंत शेतकरी असाच वैफल्यग्रस्त व निराश होवुन द्राक्षबागाना कुऱ्हाड लावणार हे नक्की.

*आता टेंभुच्या पाण्याची प्रतिक्षा….*

चांद्यापासुन बांद्यापर्यंतच्या राजकीय गोडगप्पा ऐकून हताश झालेल्या सावळज मधील शेतकऱ्यांना आता टेंभुच्या पाण्याची प्रतिक्षा आहे. टेंभुच्या पाचव्या टप्प्यातुन अग्रणीला पाणी सोडून अग्रणी बारमाही करण्याचे राजकीय आश्वासन नेतेमंडळीनी दिले आहे. ते आश्वासन प्रत्यक्षात लवकरच उतरेल इतकीच आशा सावळज व परीसरातील शेतकऱ्यांना वाटत आहे.

*हा कसला शेतकरी सन्मान…..*

केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना प्रतीवर्षी सहा हजार रुपये अनुदान राशी मंजुर केली आहे. परंतु महागाईव दुष्काळाने होरपलेल्या शेतकऱ्यांना ही तुटपुंजी मदत म्हणजे सन्मान नसुन अवमान असल्याची भावना दुष्काळी भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.