मंडला (मध्यप्रदेश) – सध्या हिंदु धर्माचे मानबिंदू असलेले गोमाता, गंगा, मंदिरे, संत आदींना काहीही घटनात्मक महत्त्व नाही. आंतरराष्ट्रीय सीमावाद, आतंकवाद, भ्रष्टाचार आदी सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्रातच उपाय शक्य आहे. अशा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत केले.
येथील सुरंग देवरी गोशाळेमध्ये नुकतीच ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला पू. रामदासजी महाराज, हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनीही संबोधित केले. या वेळी जबलपूर, मंडला, सिवनी तसेच अन्य जिल्ह्यांमधील परिषदेचे १०० हून अधिक सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन सर्वश्री जमुनाप्रसाद विश्वकर्मा, संतोष कछवाह आणि अक्षय झा यांनी केले, तर आभारप्रदर्शन हिंदु सेवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. धर्मेंद्र सिंह यांनी केले.