वंचित बहुजन आघाडी भाजपा – काँग्रेसचं गणित बिघडविणार !

0
853
Google search engine
Google search engine

प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवैसी यांच्या बहुजन वंचित आघाडीची क्रेज

दलित – मुस्लीम मते एकसंघ येणार का ?

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 

बहुप्रतिक्षेनंतर अखेर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेल पुढे ठेऊन काँग्रेसच्या हातातुन सत्ता घेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर या काळात इतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल २१ राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र देशात या काळात दलितांच्या सुरक्षितता व दलितांवर अन्याय अत्याचार व भिमा कोरेगाव सारखी दंगल सरकारने घडवली असा आरोप भाजपावर आहे. तर दुसरीकडे संविधान जाळण्यात आले. त्यामुळे बहुजन समाज असुरक्षित असल्याचं म्हटलं जात असुन मुस्लीम, धनगर समाजाला सुध्दा आरक्षणापासुन दुर ठेवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेक समाज एकत्र होऊन प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवैसी यांनी बहुजन वंचित आघाडीची स्थापना करून उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविल्यामुळे काही प्रमाणात वंचित बहुजन आघाडी भाजपा – काँग्रेसचं गणित बिघडविणार असल्याचे चित्र दिसत आहे.

    आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून खेचण्यासाठी देशात सर्वाधिक सत्ता काबीज करणाऱ्या काँग्रेसने आगामी निवडणूकीत सत्तेसाठी आटापिटा सुरू केला. तर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार व संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यात एक बहुजन वंचित आघाडी स्थापन करत राज्यातील दलित, मुस्लिम, धनगर, तेली, माळी, कुणबी, आदिवासी, कोळी सह वंचित घटकातील समाज एकत्र केला व याला मुस्लिम समाज नेते एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी साथ देत राज्यात घेतलेल्या संयुक्त सभा वंचित आघाडीच्या गाजल्या. राष्ट्रीय राजकारणात अख्या देशात वेगळे स्थान असलेल्या ओवैसी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देऊन महाराष्ट्रातील प्रस्थापित पुढाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे केले असून भीमकोरेगावच्या दंगली नंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांची समाजात क्रेज वाढलेली दिसत आहे.

राष्ट्रीय पक्ष म्हणुन ओळख असलेल्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत खाते सुद्धा उघडता आले नाही. तेव्हा २०१९ च्या निवडणुकी मध्ये बी.एस.पी. चा हक्काचा मतदार वंचित बहुजन आघाडी ला छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडी च्या सभांना लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद हा मतांच्या आकडेवारीत बदलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण आंबेडकर व ओवैसी यांच्या सभांना लोक स्वखर्चाने वाहन करून कुठलीही अपेक्षा न ठेवता जमत होते. ही प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवैसी यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी चा प्रस्ताव अमान्य करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कारण गत लोकसभा निवडणुकीत फक्त २ जागेवर काँग्रेस ने विजय मिळवला होता तर मातब्बर नेत्यांना पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा काँग्रेस चा परंपरा गत दलित मतदार हा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे नव्या आशेने पाहत असून असदुद्दीन ओवैसी च्या माध्यमातून काँग्रेसची मुस्लिम मते वंचित आघाडी कडे आकर्षित होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडी आपले स्थान भक्कम करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीला मत विभाजनाची चिंता!

आताच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांची युती असून कोणताही मजबूत दलित पक्ष काँग्रेस पक्षा सोबत नाही. त्यामुळे दलित व वंचित मते काँग्रेसच्या पारड्यात पडणार नाही अशी भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे दलित मतांचे विभाजण होणार असल्याची चिंता काँग्रेस पक्षाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला मत विभाजनाची चिंता सतावत आहे. कारण आता बहुजन वंचित आघाडीची क्रेज दिवसेंदिवस वाढत असल्याने भारिप नेते बाळासाहेब आंबेडकर व असदुद्दीन ओवैसी यांच्या रूपाने दलित, मुस्लीम व वंचित समाजाला खंबीर नेतृत्व मिळाले आहे. मात्र असे झाले तर काँग्रेस व राष्ट्रवादी चे पाणीपत होणार हे निश्चित!