6.50 लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द

0
579

सरकारला 30 दिवसाचा अल्टीमेटम, निर्णय घ्या अन्यथा मुंबईचा दूध आणि भाजीपाला रोखणार – खा. राजू शेट्टी

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – सरकारने शेतकऱ्यांची 30 दिवसात कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा 1 जुलै पासून मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो सिटीचा दूध आणि भाजीपाला रोखू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. मुंबईत आत्मक्लेश यात्रेचा समारोप झाला. यावेळी 6.50 लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. तसेच तुमच्या या सर्व मागण्या आम्ही सरकारपर्यत पोहचवू तसेच कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे मागण्या सादर करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.




आज परळ ते राणीचा बाग अशी पदयात्रा काढण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी आपला सहभाग दर्शविला. मुंबईत प्रथमच शेतकऱ्यांचा विक्रमी मोर्चा निघाला होता. सगळीकडे कर्जमुक्तीच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना खा. शेट्टी म्हणाले, गेल्या 9 दिवसापासून आम्ही पुणेहून चालत चालत उन्हामध्ये सुर्याचे चटके खात आहोत. या 9 दिवसात एकाही मंत्र्याने अथवा अधिकार्याने विचारपूस केली नाही. तुम्हाला याची लाज का वाटली नाही? आम्ही काही गुन्हेगार नाही. देवेद्र फडणवीस साहेब तुम्ही कधीही मैदानात या माझी कुस्ती करण्याची तयारी आहे. मुंबईत येऊन मी तुम्हाला आव्हान देतो आहे. दोन हात करण्याची माझी कधीही तयारी आहे. मी डगमगणारा नेता नाही. मला लाल दिव्याची कधीच आस नाही. लाल दिवा घ्यायचा असता तर दहा वर्षापुर्वीच मी घेतला असता, मी लाल दिव्याचा लालची माणूस नाही. मला फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. सत्तेत रहायचे का नाही हे शेतकऱ्यांनीच ठरवावे, त्यावर सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावून सत्तेतून बाहेर पडा, अशी मागणी केली. खा. शेट्टी म्हणाले, याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल, तुमच्या मागण्या मी राज्यकार्यकारिणी च्या बैठकीत मांडतो. मी काही हुकूमशाही नाही. एका महिन्यात राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊ त्यात निर्णय घेऊ, असेही शेट्टी म्हणाले. समृध्दी महामार्ग कदापि होऊ देणार नाही. याला माझा तीव्र विरोध आहे. रक्तातील शेवटचा थेंब आहे तोवर मी लढत राहणार आहे. रविकांत तुपकर म्हणाले, माझा राजीनामा माझ्या खिशात आहे. कधीही आदेश द्या मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी सत्तेला लाचार नाही. प्रा. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, माणिक कदम, देवेंद्र भुयार, राहूल मोरे, विकास देशमुख, रसिकाताई ढगे, राजेंद्र ढवाण, सुरेश गवळी, प्रल्हाद इंगोले, दामू इंगोले, सागर संभूशेटे, सागर चिपरगे, सचिन नलवडे, योगेश पांडे, राजू तळसंगी आदी उपस्थित होते.