चांदुर रेल्वे – ( शहेजाद खान )-
सद्या उन्हाळ्याचे दिवस संपत असुन पावसाळ्याला काही दिवसातच सुरूवात होणार आहे. आतापासुनच अनेक भागात अवकाळी पाऊस सुध्दा पडत आहे. मात्र भर उन्हाळ्यात पाणीटंचाई असलेल्या घुईखेडमध्ये आता पावसाळ्यातही पाणी टंचाई राहणारच असे चिन्ह दिसत आहे.कारण आता पाण्याची परीस्थिती पहिलेपोक्षाही बिकट झाल्याचे समजते. त्यामुळे घुईखेडचा पाणीप्रश्न कधी सुटणार असा प्रश्न पडला आहे.
बेंबळा प्रकल्पांतर्गत गेल्या ८ वषार्ंपासून स्थलांतरीत झालेल्या तालुक्यातील घुईखेड पुनर्वसित गावांत नागरिकांना पाणी टंचाईमुळे पाण्याला वनवन फिरावे लागत आहे तसेच आठ- दहा दिवसांनी टॅंकरने केला जात असलेल्या पाणी पुरवठ्य़ामुळे पुनर्वसित नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. बेंबळा प्रकल्प, यवतमाळ अंतर्गत गेल्या ८ वर्षांपासून तालुक्यातील घुईखेड गावचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु सुख सुविधाचा अभाव अजुनही जाणवत आहे. कारण गावामध्ये काही ठिकानी नळ कनेक्शन आणि विहीर, हॅन्डपंप करण्यात आले. पण त्याला पाणी नसल्याने गावकर्यांच्या पाण्याची चांगलीच फजिती होत आहे. तेव्हा गावकर्यांना पाणी व्यवस्था म्हणून गावात केवळ २ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पण तेही सुरळीत मिळत नसल्याने गावात चांगलीच संतापाची लाट पसरली आहे. तेव्हा गावातील महत्त्वाची सुख सुविधा म्हणून पाणीपुरवठा केला जावा, अशी तरतुद असताना गावाचे स्थलांतर होऊन कित्येक वर्ष उलटूनही यावर संबंधीत अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा, गावकरी हे अधिकार्यांच्या विरोधात चांगलेच संतापले आहे. अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोेटे यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवावा तसेच गावात व्यवस्थित पाणीपुरवठा करून देण्यात यावा अशी जोर धरत आहे.