*मोर्शी वरुड रोडवर जीवघेणे खड्डे !*
रुपेश वाळके/ मोर्शी
मोर्शी वरुड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असल्याने, वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मोर्शी वरुड रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की, रोज येथे दोन तीन तरी छोटे मोठे अपघात घडत आहेत. यामुळे नागरिक व वाहन चालक यांच्यातून प्रशासनाविरूध नाराजीचा सूर निघत आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथून केली जात होती .परंतु त्यावर प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे रस्त्यांवर खड्यांचे प्रमाण वाढले असून हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा असल्यामुळे हा रस्ता महत्त्वाचा असून देखील या रस्त्याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे पाहून मोर्शी तालुक्यातील कु भाग्यश्री चौधरी व रुपेश वाळके यांनी पुढाकार घेऊन युवकांनी श्रमदान करून खड्डे बुजऊन शासनाचा निषेध केला आहे. या रस्त्यावरून लगतच्या 30 ते 40 गाव, खेड्या पाड्यातील नागरिक व वाहन चालक वाहतुकीसाठी वापरतात. तसेच या रस्त्यावर सततची रहदारी आहे. सदर रस्ता अमरावती नागपूर , अमरावती मूलताई , अमरावती पांढुर्णा या महामार्गांना जोडला जातो.
त्यामुळे सहाजिकच हा रस्ता सतत वर्दळीच्या स्वरूपात दिसत आहे. वाढत्या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. बर्याचवेळा पाणी भरल्याने हे खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे वाहनांना धक्के बसून अपघात होतात किंवा वाहने खिळखिळी होतात. या वाढत्या खड्ड्यांमुळे विशेषत:मोटारसायकल चालकांमध्ये पाठदुखीचे प्रमाण वाढले आहे. बर्याचवेळा निकषानुसार रस्त्यांची कामे केली जात नाहीत.डांबरीकरण करताना खडीची क्वालिटी, बीबीएम लेअर, कार्पेट आदींबाबत यंत्रणेकडून गांभिर्याने तपासणी होत नसल्याने निकृष्ट कामे होतात. त्यामुळे या रस्त्यावर इतके मोठे मोठे खड्डे पडले आहेत की, यामुळे या रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी येथे वाहन चालवताना मोठीच कसरत करावी लागते. सदर रस्त्यावर वाहने चालविणार्या वाहन चालकांना पाठीच्या व मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी करून मोर्शी येथील युवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गांधीगिरी करून रोडवर पडलेले खड्डे बुजऊन शासनाचा निषेध व्यक्त केला त्यावेळी
रेनबो
ग्रुपचे कु भाग्यश्री चौधरी , बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके , चेतन चव्हाण , त्रिशूल गेडाम , अक्षय काळे , यश चिखले , आकाश चौधरी यांच्यासह आदी युवक मंडळी उपस्थित होती .
या रस्त्यांचा दर्जा तपासणारी क्वालिटी कंट्रोल नावाची यंत्रणा असते, मात्र ती सध्या कितपत कार्यरत आहे, हाही संशोधनाचा विषय आहे. रस्ता कामात वापरली जाणारी खडी, डांबर याचाही दर्जा क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासला जातो. मात्र हे काम गांभिर्याने होत नसल्यानेच कामे निकृष्ट होत असल्याचे पुढे येत आहे. खरे तर या निकृष्ट कामांबाबत शासन प्रशासनाला कधी जाग येणार ? असा प्रश्न मोर्शी तालुक्यातील नागरीकांना पडला आहे !