नैसर्गिक आपत्तीमुळे मयत व्यक्तींच्या वारसांना
आमदारांच्या हस्ते धनादेश वाटप
चाळीसगाव-
रविवार दिनांक 07 मे, 2017 रोजी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मौजे खेडगांव व मौजे पिलखोड येथील दोन व्यक्तींच्या अंगावर विज कोसळून नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला होता. या मयतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत होण्यासाठी तालुक्याचे आमदार श्री.उन्मेश पाटील यांनी पाठपुरावा करत आज त्यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा प्रत्येकी रु. 4 लाखाच्या धनादेशांचे वाटप आमदार श्री.उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चाळीसगांव तालुक्यातील मौजे खेडगांव येथील पितांबर हिरामण सुर्यवंशी (रामोशी) वय 21 वर्षे हा तरुण शेतात कामासाठी गेला असता अचानक विज त्याच्या अंगावर कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. तर तालुक्यातील मौजे पिलखोड येथील किरण सतिलाल माळी (भिल्ल) वय 22 वर्षे हा तरुण पिंप्री शिवारात लाकडे घेण्यासाठी गेला असता अचानक विज त्याच्या अंगावर कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. या दोघा मयतांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आमदार श्री.उन्मेश पाटील व तालुका प्रशासनाच्या वतीने तहसिलदार कैलास देवरे यांनी थेट मयतांच्या निवासस्थानी (खेडगांव व पिलखोड) येथे जाऊन मदतीचा धनादेश मयतांच्या वारसांकडे सुपूर्त केला. यावेळी त्यांच्या समवेत संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, खेडगावचे सरपंच माळी, पंकज साळुंखे, राकेश बोरसे स्थानिक लोकप्रतिनीधींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.