नवी देहली –
भगवान श्रीराम यांचा अयोध्येत जन्म झाला, अशी हिंदूंची आस्था आहे तशीच आस्था तोंडी तलाकच्या संदर्भात मुसलमानांची आहे. रामावरील हिंदूंच्या आस्थेवर शंका घेता येत नाही, तर मग तिहेरी तलाकवर प्रश्न का ?, असा प्रश्न काँग्रेसचे नेते आणि अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाकवरील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित केला. तोंडी तलाकची पद्धत १ सहस्र ४०० वर्षांपासून आहे. मग या पद्धतीला बिगरइस्लामी म्हणणारे आपण कोण? तुम्ही तोंडी तलाक घटनाबाह्य कसे म्हणू शकता, असे प्रश्नही सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. तीन तलाक अमान्य झाल्यास नवीन कायदा करण्याच्या केंद्र सरकारच्या वक्तव्यावरूनही सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले.
इस्लाममध्ये ‘ई-तलाक’ आणि ‘व्हॉट्स अॅप’द्वारे दिलेल्या तलाकची जागा काय आहे ?, असा प्रश्न न्यायालयाने या वेळी पर्सनल लॉ बोर्डला विचारला. त्यावर कपिल सिब्बल यांनी बोर्डाची बाजू मांडली. श्रद्धेच्या विषयात न्यायालयाने हस्तक्षेप करू नये. तोंडी तलाक समानतेशी संबंधित सूत्र नाही. हा श्रद्धेचा विषय आहे; मग न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये. निकाह आणि तलाक हे एकमेकांशी जुळलेले आहेत, तर दुसर्यांना हे खूपण्याचे कारण काय ?, असा प्रश्न सिब्बल यांनी केला.