चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .)
सद्या दुरचित्रवाहीनीवर सुरू असलेल्या राजश्री पान मसाल्याच्या जाहिरातीमधुन ढोल पथकाचे चित्रफित वगळुन संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी या मागणी निवेदन स्थानिक ब्रम्हांडनायक प्रतिष्ठानतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांना पाठविण्यात आले.
ढोलपथक ही संस्कृती महाराष्ट्राला मिळालेली एक अनमोल आणि गौरवशाली भेट आहे. महाराष्ट्रातील तमाम वादक साधी सोप, सुपारी सुध्दा वादना दरम्यान वा सरावा दरम्यान खात नाही. तसेच जर कोणी बाहेरील व्यक्ती सुपारी जरी खावुन आला तर त्याला ढोलाला हातसुध्दा लावु देत नाही. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ढोल पथकांची स्थापना करण्यात आली, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही साध्या सुपारीच्या खांडाला सुध्दा स्पर्श केला नाही. मात्र आज राजश्री पान मसाल्याच्या जाहीरातीमध्ये सर्रासपणे ढोलपथकांचा वापर करीत आहे. यामुळे आपल्या संस्कृतीचा अपमान तर होत आहेच सोबतच महाराजांची प्रतिमा मलीन करण्याचे कृत्य सुध्दा ही जाहीरात करीत आहे. त्यामुळे ही जाहीरात सर्व प्रसारमाध्यमांमधुन वगळुन राजश्री पान मसाल्याच्या जाहीरातीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्रम्हांडनायक प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, संस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांना केली आहे. जेणे करून यानंतर पुर्ण अभ्यास व माहिती घेतल्याशिवाय असे कृत्य कोणीही करणार नाहीत.
निवेदन पाठवितेवेळी ब्रम्हांडनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर तेलकुंटे, उपाध्यक्ष इफ्तेखार म. हुसेन, सचिव सागर गरूड, कोषाध्यक्ष अमन ठाकुर यांच्या इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.