मोर्शी तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर !  शेतकऱ्यांची चिंता वाढली… पंचनामे करण्याची मागणी !

0
1403

मोर्शी तालुक्यात कपाशिवर गेला लाल्या तुरीही करपण्याच्या मार्गावर !

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी – सौ वृषालिताई विघे !

रुपेश वाळके / मोर्शी –

मोर्शी तालुक्यातील परिसरात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने पुन्हा एकदा मोर्शी तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्यावतीने रोग नियंत्रणासाठी शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षात कापसाला चांगला हमी भाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. शेतक-याने कपाशीची लागवड करताना महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा अवस्थेत कपाशीची लागवड केली. अन दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. सध्या कापसावर किडी व रोगाने थैमान मांडल्याचे दिसुन येत आहे. गेल्या दिवसाच्या पावसाच्या आगमनानंतर आत्ता लागण झालेला कापूस शेतक-यांच्या हाती लागेल की नाही ही चिंता शेतक-यांमध्ये पसरली आहे. कपाशीची लागवड झाल्यानंतर पावसाने कांही काळ दडी मारल्याने व दुषित हवामानामुळे कापसाच्या झाडावरील फुलाची व पत्त्यांची गळ झालेली आहे. कमी पावसावर तग धरुन राहिलेल्या कपाशीवर लाल्या रोगाने थैमान घातल्याने पुन्हा शेतक-यांवर अडचणीचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी लाल्या रोगाच्या नियंत्रणासाठी महागडे औषधांची खरेदी करुन फवारणी करताना दिसत आहेत. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि पुन्हा लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. पांढरे सोने अशी ओळख असणा-या कापूस पिकाचे क्षेत्र वाढून सुद्धा निसर्गाने लाल्या व किड आणि रोगाने ग्रासल्याने कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. हातात दमडीही शिल्लक नसताना देखील बियाने व रासायणीक खते – औषधींची किंमत दुपटीने वाढुन सुद्धा उधारी – उसनवारी, व्याजी दिडी करून शेतक-यांनी नगदी पिकांमध्ये पहिल्या पसंतीचे पिक म्हणुन मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. तसेच अनेकांनी कमी खर्चातील पिक म्हणून सोयाबीनसह तूर , उडीद, मूग, ज्वारीची सुद्धा पेरणी मोठ्या प्रमाणात केली. परंतु मधेच दीड महिना पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन सह अन्य पिकांची वाढ खुंटल्याने अल्प पावसाचा फटका संत्रा ,कपाशी , सोयाबीन , उडीद , मुंग ,या पिकांना बसला. त्यातही सोयाबीन शेंगावर आले असताना, पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे लागलेल्या शेंगा गळून पडल्या आणि काही शेतकऱ्यांना सोयाबीन मधेच रोटावेटर फिरवावे लागले त्यामुळे त्यांचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झाले . त्यामुळे शेतक-यांच्या पुर्ण आशा कापसावर आणि तुरीवर केंद्रीत झाल्या होत्या. परंतु ऐन फुल व बोंड्यावर असतांनिच रस सोशन करणा-या किडीचा प्रार्दुभाव झाल्यामुळे कापसावर लाल्या रोगाणे प्रहार केला. यापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्यांनी ३ ते ५ वेळा महागडी औषधी फवारली. परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. उलट झाडाला लागलेल्या पात्या बोंडे गळू लागल्याने कपाशीच्या बोंडाचे प्रमाणही घटु लागले असल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णतः धास्तावला आहे.

कधी कृत्रीम, कधी नैसर्गीक संकटाच्या गर्तेत सापडलेला मोर्शी तालुक्यातील शेतकरी आता अचानक उद्भवलेल्या या लाल्याच्या संकटामुळे पुर्ण भांबावुन गेला आहे. जानेवारी – फेब्रुवारी दरम्यान कापसावर लाल्या रोगाचा प्रार्दुभाव आढळुन येत होता. तोपर्यंत कापसाचे दोन ते तीन वेचनी झालेली रहायची परंतु यंदा कपाशी बोंड्यावर असतांनाच कापसाला लाल्या रोगाने घेरल्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थीक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुरून कापूस ४ ते ५ फुट उंचीचा हिरवा दिसत असला तरी झाडाला वाकवून पाहिल्यास सर्वंतर लाल्याचा प्रादुर्भाव आणि पांढरी माशीसह अन्य रस शोषण करणाऱ्या किडीचे आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे झाडांना सुद्धा १० ते १२ बोंडे पिकलेली आणि शिल्लक असलेली गळू लागल्यामुळे कपाशी लागवडीसाठी केलेला एका ब्यागचा खर्च सुद्धा निघेल कि नाही अशी चिंता शेतकर्यांना लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के सुद्धा पाणी झाले नाही. त्यामुळे परिसरातील नदी ,नाले, कोरडे होत असून,आत्तापासूनच अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी काळात मोर्शी तालुक्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे बेहाल झाले असून, बळीराजा हतबल झाला आहे. पिकांची हि परस्थिती पाहून तरी शासनाने मोर्शी तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन संकटातून बाहेर काढावे अशी रास्त मागणी माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालिताई प्रकाशराव विघे यांनी केली आहे.

*मोर्शी तालुक्यात या वर्षी पावसाने दगा दिल्यामुळे मृग बहाराचा संत्रा फुटलाच नाही , कापसाला बोंडे धरण्याच्या तर सोयाबीनला शेंगा पकडण्याच्या काळात पावसाने दांडी मारली. आता लाल्यारोग पडल्याने पाती, लहान मोठे बोंडे आपोआप गळून पडत आहेत. सोयाबीनवर करप्या रोग आल्याने शेंगा भरल्या नाहीत, तुरीही करपण्याच्या मार्गावर आहे .शेतकऱ्यांचा आंबिया बहाराचा संत्रा सुद्धा गळून पडला या वर्षी अपुऱ्या पावसाने विहिरींची लेवलही वाढली नसल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने ताबडतोब पिकाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालिताई प्रकाशराव विघे यांनी केली .