संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील – श्री राजकुमार बडोले

0
792

गोंदिया –

 

यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. अलिकडेच धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे दुष्काळाची स्थिती व दुसरीकडे तुडतुड्याचे संकट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गोरेगाव तालुक्यातील तेढा येथे 17 नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालय गोरेगावच्या वतीने चक्रीवादळामुळे बाधित आपदग्रस्तांना धनादेशाचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, जि.प.सदस्य ज्योती वालदे, जि.प.माजी समाजकल्याण समिती सभापती कुसन घासले, संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, माजी जि.प.सदस्य जितेंद्र शेंडे, तेढा सरपंच रत्नकला भेंडारकर, उपसरपंच डॉ.विवेक शेंडे यांची उपस्थिती होती.
श्री.बडोले म्हणाले, पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी देता येणार नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड करावी. यासाठी 3 हजार क्विंटल हरभरा अनुदानावर जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. उपग्रहाच्या आधारे यावर्षी दुष्काळाचे मोजमाप करण्यात आल्यामुळे तीनच तालुके मध्यम दुष्काळाचे घोषित करण्यात आले आहे. सडक/अर्जुनी व अर्जुनी/मोरगाव तालुक्यासह इतर तालुकेसुध्दा दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांनी रोवणी केली नाही त्यांना मोबदला देण्यासाठी शासन मदत करेल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, गोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यामुळे या तालुक्याला शासनाच्या निकषानुसार दुष्काळाच्या सवलती मिळणार आहे. या भागातील रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, दळणवळणाची चांगली रस्ते त्यामुळे निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.सदस्य ज्योती वालदे व सरपंच रत्नकला भेंडारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गोरेगाव तालुक्यातील 1165 घरांचे एप्रिल व मे 2016 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून त्यासाठी 31 लक्ष 6 हजार 50 रुपये निधी उपलब्ध झाला आहे. बाधितांना धनादेशाचे वाटप उर्वरित गावात सुध्दा करण्यात येणार आहे. तेढा येथील 161 घरांचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून 168 कुटूंबांना 5 लक्ष 15 हजार रुपये धनादेशाचे वितरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाधितांना करण्यात आले.
तेढा व बाधित गावातील रामचंद्र भेंडारकर, छबीलाल अंबादे, सुमन टेंभूर्णेकर, डिगांबर खरोले, शांताबाई आस्वले, पुरणलाल पटले, छबीलाल पटले, बाबुलाल मेश्राम, हिरामन पटले, भागीरथा पंचभाई, देवलाबाई घासले, पार्बताबाई राऊत, रामचंद्र राऊत, बिजू भंडारी, झेलनबाई कोहळे, नंदलाल गाथे, दुलीचंद राऊत, प्रेमलाल वरकडे, अशोक पटले आदी बाधितांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. तेढा ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.