नवी देहली – भारतात सुमारे ३६ सहस्र रोहिंग्या मुसलमान रहात आहेत आणि त्यांचे आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे नाकारता येत नाही, असे विधान सीमा सुरक्षा दलाचे संचालक के.के. शर्मा यांनी केले आहे. यावर्षांत सीमा सुरक्षा दलाने आतापर्यंत ८७ रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेश सीमेवरून अटक केली आणि त्यातील ७६ जणांना परत बांगलादेशात पाठवून दिले, अशी माहिती त्यांनी दिली.
शर्मा यांनी स्पष्ट केले की, अद्याप एकाही रोहिंग्याला शस्त्र किंवा बॉम्ब बाळल्यावरून अटक करण्यात आलेली नाही; मात्र काही गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे आतंकवादी संघटनांशी संबंध असू शकतात. मलाही तसे असण्याचा संशय आहे.
शर्मा म्हणाले की, सध्या बांगलादेशमध्ये ८-९ लाख रोहिंग्या शरणार्थी म्हणून रहात आहेत आणि ते भारतात घुसण्याची शक्यता आहे. सीमेवर आम्हाला कोण रोहिंग्या आहे आणि कोण बांगलादेशी हे पडताळता येत नाही. त्यामुळे जो कोणी सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आम्ही रोखून परत पाठवून देतो.