जिल्ह्यातील राज्य मार्गदुरूस्तीचे 92 टक्के कामे पूर्ण कामांच्या दर्जाची पुन्हा तपासणी करू – मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील

0
995

* 510 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरणा पूर्ण
* 15 डिसेंबरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करणार

अमरावती-: राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. जिल्ह्यातील राज्य मार्गांच्या दुरुस्तीचे 92 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे. ही कामे दर्जेदार असल्याचे परिसरातील नागरिकांकडून प्रमाणित करुन घ्यावे. मी स्वत:ही अधिवेशनानंतर या कामांची पुन्हा तपासणी करणार आहे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभियंत्यांना आज येथे दिले.

राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन कामांचा आढावा घेत आहेत. आतापर्यंत त्यांनी 27 जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील कामांची माहिती घेतली आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात आज त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह, मुख्य अभियंता सी. व्ही. तुंगे, अधिक्षक अभियंता श्री. साळवे यांच्यासह विविध कार्यकारी अभियंता, उपअभियंता , सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

जिल्ह्यातील राज्य मार्ग रस्त्यांची 92 टक्के कामे पूर्ण झालीत, हे कौतुकास्पद असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले की, विभागामार्फत पश्चिम विदर्भात सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्चून महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरु आहे. महामार्ग व राज्य महामार्गावर खड्डे पडण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. निधीची कमतरता, अद्ययावत यंत्रणा उपयोगात न आणणे, कमी क्षमता असणाऱ्या रस्त्यांवरुन जड वाहनांची वाहतूक, पावसाळ्यातील नैसर्गिक बाबी आदींमुळे रस्ते नादुरुस्त होतात. येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख महामार्ग, राज्य मार्गांवरील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक अभियंत्याकडे मंडळनिहाय रस्त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, नियंत्रणाची जबाबदारी वरिष्ठ अधिका-यांवर आहे. त्याशिवाय, कामे पूर्ण झाल्याची छायाचित्रे जिओ टॅगिंगच्या माध्यमातून मंत्रालय वॉररुमला पाठविण्यात यावी. रस्तेदुरुस्तीत उत्तम कामगिरी करणा-यांना बक्षीसेही देण्यात येणार आहेत. आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पदोन्नतीसंबंधी अनुशेष भरुन काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अधिक्षक अभियंता श्री. साळवे यांनी जिल्ह्यातील कामांबाबत सादरीकरण केले.
जिल्हयात प्रमुख राज्य व राज्य मार्ग रस्त्यांची लांबी 1629 किमी आहे. सुमारे 556 किमी लांबीच्या रस्ते नादुरुस्त होते. त्यातील 510 किमी लांबीच्या रस्त्यांवर खड्डे बुजविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कामांची 92 टक्केवारी आहे, असे श्री. साळवे म्हणाले.
बैठकीच्या शेवटच्या सत्रात श्री. पाटील यांनी अभियंत्यांशी विभागाच्या विकासासाठी नव्या संकल्पना, नवीन संशोधन याबाबत सुसंवाद साधला. यावेळी मोबाईल फील्ड लॅबचा (क्षेत्रीय प्रयोगशाळा फिरते पथक) शुभारंभही यावेळी झाला