शेती व शेतीपूरक व्यवसायला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
848
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेती व सामूहिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आज शुभारंभ केलेल्या चार योजना महत्त्वाची भूमिका बजावणार असून येत्या वर्षभरात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या अडीच लाख युवकांना प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर राज्यातील आणखी अडीच लाख युवकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्यविकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या चार महत्त्वाच्या योजनांचा आज शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.

आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांना भरघोसअर्थसहाय्य करणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना, शेतकरी कुशल योजना या चार योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेशुभारंभ आज करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाने मराठा आरक्षणाच्या विषयावर सकारात्मक कार्यवाही केली. आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात शासनाने लावून धरला आहे. आजच्या तरुणांना नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक असून ती राज्य शासनाची जबाबदारीही मानतो. शुभांरभ करण्यात आलेल्या नव्या चार योजनांची तातडीने सुरुवात करु शकलो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज शिक्षण प्रतिपूर्ती योजना ही 602 अभ्यासक्रमांना लागू केली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निवासाच्या सोयही उपलब्ध करुन देण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शेतीमध्ये रोजगार आणि नव उद्योजकता निर्माण होणे आवश्यक असून त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासविकास महामंडळाच्या माध्यमातून या चार नव्या योजना तयारकेल्या आहेत. या योजनांमुळे युवकांना शेती आणि उद्योगधंद्याची कौशल्ये विकसित करणे शक्य होणार आहे, असे सांगून या महामंडळामार्फत ‘प्रोजेक्ट ॲप्रॉयझल सिस्टीम’ तयार केली आहे, त्याअंतर्गत कर्ज देण्याचे काम बॅंका करतील आणि व्याजाचे पैसे महामंडळ भरणार आहे. मंत्रीमंडळ उप समितीमार्फत या योजनांचा दर पंधरवड्याला आढावा घेऊन त्यातील अडचणी दूरकरण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सामूहिक शेती करीत असताना मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते यासाठी कृषिउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतीमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज बोलून दाखवली. 1906 मध्ये आपण शेतीसाठी युरिया वापरण्यास सुरुवात केली. 112 वर्षानंतरही शेतीसाठी आपण युरियाला पर्याय उपलब्ध करु शकलो नाही, जमीनीचा पोत खराब होऊ न देता आजच्या विज्ञानाशी सुसंगत प्रयोगशील शेती करण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, आज ईस्त्राईलमधील शेती ही सर्वांत प्रगत शेती मानली जाते कारण त्यांनी प्रयोगशील पध्दतीने आवश्यक त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती व्यवसाय समृध्द केला. महाराष्ट्रातही त्याच पध्दतीने कुशल शेतकरी निर्माण करताना शेतीमध्ये बदल करुन आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगशीलतेचा वापर होणे आवश्यक आहे. शुभारंभ करण्यात आलेल्या चार योजनांच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत चार योजनांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम(सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास वउद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, यांचेसह आ. प्रसाद लाड, आ. नरेंद्र पाटील,  आ. विनायक मेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
3. गट प्रकल्प कर्ज योजना
4. शेतकरी कुशल योजना