चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .)
साफसफाईच्या जनजागृतीसाठी शासनातर्फे लाखो रूपये खर्च केले जातात. अशातच शहरातील इंदिरा नगर परीसरातील चिमुकल्यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत परिसरातील सर्व कचरा गोळा करून अनोखी होळी पेटवून एक वेगळा संदेश दिला.
शासन पातळीवर सर्वत्र ग्रामस्वच्छता अभियानाची सक्ती होत असतानाही ग्रामीण भागात आजही स्वच्छतेबाबत अनास्था आहे. गावोगावी स्वच्छतेविषयी जनजागृती होत आहे. तरीसुद्धा ग्रामीण जनतेमध्ये याबाबत ठोस उपाययोजना होत नाहीत. स्थानिक इंदिरा नगर परीसरातील चिमुकल्यांनी याबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवल्याने आज तेथील परिसर स्वच्छ झाला आहे. चिमुकल्यांनी परिसरातील कचरा गोळा करून, त्याची होळी करून पर्यावरणपूरक होळी सण साजरा करण्यात आला. होळीच्या निमित्ताने झाडांची होणारी कत्तल रोखण्यासाठी सर्व पातळीवरून पर्यावरणपूरक होळ्या साकारण्याचे आवाहन होत असतांना याला शहरातही प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी लाकडे जाळून करू नका पाप, पुढच्या पिढीला होईल ताप असा जणु एक संदेशच यावेळी देण्यात आला. इंदिरा नगर येथील शिवराज शर्मा या चिमुकल्याने म्हटले की, खरे पाहता होळीचा सण हा गावातील घाण जाळून साजरा करण्यासाठीच पूर्वजांनी सुरू केला असावा. मात्र पुढे याला वेगळे वळण मिळून यासाठी वृक्ष तोडून त्याच्या लाकडांची होळी सुरू झाली. होळीसाठी शेकडो वृक्षांची कत्तल होऊ लागली. याला फाटा देत आम्ही कचरा गोळा करून हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.