पोलिसांची ब्रेकिंग कारवाई
पळून गेलेला कैदी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
बीड : नितीन ढाकणे
बीड : पळून जाण्याचा प्रयत्न, आत्महत्येचा प्रयत्न आणि अखेर यशस्वी पलायन असे विविध कारनामे करून पोलिसांना जेरीस आणणाऱ्या ज्ञानेश्वर जाधव याला एक दिवसाच्या आत बेड्या ठोकण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. रेणापूर फाट्यावरून गावाकडे जात असताना तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
अंबाजोगाई येथील एका चोरीच्या प्रकरणात जिल्हा कारागृहात कैद असणाऱ्या ज्ञानेश्वर बालाजी जाधव त्याच्या विविध कारनाम्यांमुळे मागील दहा दिवसापासून चर्चेत आहे. १५ मार्च रोजी त्याने कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या प्रयत्नात हात-पाय मोडले होते. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्याने दि. २४ मार्च रोजी शौचालयाच्या खिडकीच्या काचेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काल सोमवारी दुपारी ४.४५ वाजता रखवालीवर असणारे पोलीस हवालदार अर्जून चव्हाण हे शौचालयात गेल्याची संधी साधून ज्ञानेश्वरने हातकडीतून हात काढून पलायन केले होते. या घटनेने जिल्हा पोलीस दलात एकाच खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिस यांची पथके तातडीने ज्ञानेश्वरच्या शोधात लागली होती. ज्ञानेश्वर गावाकडे म्हणजे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रुपनगर तांड्याकडे जाण्याच्या शक्यतेने पोलिसांनी त्या भागात पाळत ठेवली होती. पोलिसांच्या हा अंदाज खरा ठरला आणि अखेर आज सकाळच्या सुमारास रेणापूर फाट्यावरून ज्ञानेश्वरला पुन्हा बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. हि कारवाई शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोनार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. कैदेतील आरोपी पळून गेल्याने पोलीसांसमोरील अडचणी वाढल्या होत्या, मात्र एक दिवसाच्या आताच पुन्हा त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.