चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .)
चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत एकुण ४९ ग्रामपंचायती असून प्रत्येक ग्राम पंचायतीत भारत निर्माण योजनेच्या व १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत पाणी पुरवठा योजनेवर करोडो रुपयांचा निधि खर्च करण्यात आला. तरी आज तालुक्यातील निम्म्याच्या वर ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून महिन्यातून केवळ दोनदा ग्रामस्थांना पाणीपुरवठा केल्या जात असल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे.
तालुक्यातील मालखेड, पळसखेड, राजुरा, बोरी, अमदोरी, बागापूर, वाई, चिरोडी, निंभा, निमगव्हान, सालोरा खुर्द, सांवगी मग्रापुर, सांवगा विठोबा या गावात सद्यस्थितीत पाणी टंचाई असून त्यातील मालखेड या गावाला चक्क 17 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवत आहे. तर घुईखेड, टिटवा, मोगरा, सावंगा (बुगरूग) या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या अंतर्गत बासलापुर, धनोडी, सोनोरा खुर्द, निमला, सातेफळ या गावात पाणीपुरवठा योजना पुर्ण झाली असून धानोरा म्हाली, जवळा धोञा, सोनगाव या गावातील पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर असल्याचे समजते.
पंचायत समिती अंतर्गत बांधकामावर लाखो लिटर पाणी खर्च.
चांदूर रेल्वे तालुक्यातील अधिकतर ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परीषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती निधीतून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर दररोज लाखो लिटर पाण्याचा वापर होत आहे. एकीकडे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होत नाही तर दुसरीकडे प्रशासन व ठेकेदार बांधकामाला गावतील पाणी वापरतात म्हणजेच जनता पाण्यासाठी ञस्त तर ठेकेदार,अधिकारी मस्त” अशी स्थिती तालुक्यातील बऱ्याच ग्राम पंचायतीची आहे .
पंचायत समितीने तालुक्यातील 26 ग्राम पंचायतीत केले विहिरीचे अधिग्रहण.
ग्राम पंचायत मध्ये पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीचे पाणी पुरविण्यासाठी ग्रामपंचायत असमर्थ ठरत आहे. म्हणून ग्रामपंचायतने आपल्या गावतील मुबलक पाणी असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करायला पाहिजे. परंतु ” सुस्त प्रशासनातील मस्त अधिकारी” यांनी यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज जनसामान्य नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागतं आहे. अशातच काही गावातील लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन पाणी टंचाई या विषयावर तोडगा काढून जनसेवेचा परीचय देत आहे तर २६ विहिरीवर ग्रामपंचायतीने अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करत असल्याचे समजते.