नंदुरबार – मनूने जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशशास्त्र आहे. मनूच्या सावलीला उभे रहाण्याचीही आपली लायकी नाही. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निवळ नालायकपणा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड आहे. अवघ्या ब्रह्मांडाला कह्यात घेण्याची शक्ती हिंदु धर्मात आहे, असे उद्गार श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी काढले. नंदुरबार येथे सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित धर्मसभेत ते बोलत होते.
पाकिस्तान आणि चीन यांसारख्या शत्रूदेशांविरोधात एकजुटीने उभे रहाण्याची आवश्यकता आहे; पण तसे होत नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात एकीकडे भारतीय सैनिक हुतात्मा होत असतांना दुसरीकडे आपण पाकशी क्रिकेटचे सामने खेळतो, त्यांना सणासुदीला मिठाई देतो, हे चुकीचे आहे. चीनने आपल्यावर वर्ष १९६२ मध्ये युद्ध लादले. त्यात सहस्रो सैनिक हुतात्मा झाले. असे असतांनाही आताची तरुण पिढी ‘चायनीज फूड’ चवीने खाते ?, असा संतापही पू. भिडेगुरुजी यांनी व्यक्त केला.
कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर या सभेला अनुमती देऊ नये, यासाठी दोन दिवस भारतीय रिपब्लिकन संघटनेने आंदोलन केले होते. प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पडला.