सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन अंतर्गत राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशन
रामनाथी (गोवा) – वर्ष 1947 मध्ये फाळणी झाल्यावर देश स्वतंत्र झाला. त्यानंतर वर्ष 1950 मध्ये संविधान अंमलात आणले गेले. त्या वेळी सर्वांना समान न्याय मिळेल, असे सांगितले गेले. त्यामुळे सर्व अत्याचार विसरून हिंदूंनी ते स्वीकारण्याची सिद्धता दर्शवली; मात्र प्रत्यक्षात निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना सुविधा देऊन हिंदूंचे दमन केले जात आहे. आज मुसलमान त्यांच्या धर्मासाठी फिदाईन होऊन वेळप्रसंगी स्वतःचा जीव देण्यास सिद्ध होतात.असे असतांना आपण हिंदु अधिवक्त्यांनीही कायद्याचा अभ्यास करून, न्यायालयात फिदाईन बनून हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी निःस्वार्थ वृत्तीने जीवापाड प्रयत्न करायला हवेत.
देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत असून ते रोखणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतरविरोधी कायदा होण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रयत्न करावा. आपले भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन लक्ष्मणपुरी(लखनौ) येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केले. ते येथील श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात आयोजिलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन अंतर्गत चालू असलेल्या अधिवक्त्यांच्या या अधिवेशनात अधिवक्ता हरि शंकर जैन, केरळ येथील अधिवक्ता गोविंद के. भरतन्, इंडिया विथ विझडम ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी80 हून अधिक धर्मप्रेमी अधिवक्ता उपस्थित होते. या अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी उपाय, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची आगामी दिशा अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात येईल.