चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
चांदूर रेल्वे तालुक्यात शेतशिवारात भूरट्या चोरट्यांनी थैमान माजवले असुन शेतातील साहित्य लंपास करीत आहे. यामुळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली) येथील शेतकरी प्रशांत प्रभाकरराव भगोले यांच्या कोटेरी कुंपन असलेल्या शेतातुन शनिवारी रीमझीम पावसात लोखंडी फाटकाचे कुलुप तोडून बैलबंडीचे दोन लोखंडी चाके व बंडीचे इतर लोखंडी साहित्य लंपास केले. या चोरीसाठी चारचाकी वाहन वापल्याचे दिसुन येत होते. प्रशांत भगोले यांनी या घटनेची लेखी तक्रार रविवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये दिली. या तक्रारीवरून पुढील तपास पोलीस करीत आहे. यापुर्वीसुध्दा शेतातुन विद्युत मोटारी, स्प्रिंकलर पाईप, नोझल व इतर साहित्य चोरून गेल्याच्या अनेक तक्रारींची चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात दहशत असून पोलीसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी जोर धरत आहे.