सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील भ्रष्टाचाराबाबत आधी उत्तर द्या !
काँग्रेस सरकारने अगोदर सरकारी खजिना रिता केला आणि त्यानंतर त्यांची वक्रदृष्टी हिंदू मंदिरांतील भाविकांच्या पैशावर पडली. त्या पैशावर डल्ला मारण्यासाठी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण त्यांनी चालू केले. त्याद्वारे मंदिरातील भाविकांचे कोट्यवधी रुपये लुटले, तसेच हज यात्रा आणि चर्चच्या विकासासाठी त्या निधीचा वापर केला. नुकत्याच कर्नाटकातील निवडणुकांच्या वेळी भाजपने स्वतःच्या निवडणूक घोषणापत्रात हिंदूंची सरकारीकरण केलेली मंदिरे हिंदूंना परत करणार,अशी एक प्रमुख घोषणा केली होती. महाराष्ट्रात मात्र हेच भाजप सरकार हिंदूंकडे असलेली मंदिरे काढून घेऊन त्यांचे सरकारीकरण करत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निधर्मी सरकारला हिंदूंची मंदिरे चालवण्याचा अधिकार नसून केवळ तेथील व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून ते मंदिर पुन्हा त्या त्या समाजाकडे परत देण्यास सांगितले आहे. असे असतांनाही भाजप सरकारने शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानाचे सरकारीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते. शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास जनआंदोलन उभारले जाईल, अशी चेतावणी समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.
श्री. घनवट पुढे म्हणाले की, यापूर्वीही शासनाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर,तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर, मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी येथील श्री साई संस्थान, तसेच ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’बनवून त्याद्वारे तब्बल 3067 मंदिरे ताब्यात घेतली,ज्यामध्ये कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी आणि श्री ज्योतिबा देवस्थान यांचाही समावेश आहे. या सर्व मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले. प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारला. या विषयी ‘सीआयडी’चौकशी, तसेच न्यायालयात याचिका चालू आहेत.देवनिधी लुटणार्या पापी व्यक्तींना शिक्षा न देणार्या शासनाला श्री शनैश्वर देवस्थान ताब्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही.शासनाने ताब्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्यांवर अद्याप कारवाई का केली नाही, त्या भ्रष्टाचार्यांना मोकाट का सोडले आहे, याची उत्तरे द्यावीत; अन्यथा शासनावर श्री शनिदेवच नाही, तर हिंदूंचाही कोप होईल.
हिंदु भाविक मंदिरांमध्ये दान हे सामाजिक आणि शासकीय कामांसाठी करत नाहीत, तर धर्मकार्यासाठी करत असतात. या दानाचा विनीयोग हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा. असे कार्य खरे भक्तच करू शकतात. यासाठी शासनाने आजपर्यंत अधिग्रहित केलेली सर्व मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करावीत. तसेच भ्रष्टाचार झालेल्या मंदिरातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा हिंदु जनजागृती समिती रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन छेडेल, अशी चेतावनीही श्री.घनवट यांनी या वेळी दिली.