चांदूर रेल्वे:- (शहेजाद खान )
भारतीय स्टेट बँक पळसखेड येथे खरीप पूर्व पीक कर्ज वाटप विषयीची किसान सभा पळसखेड शाखेमध्ये पार पाडली.
किसान सभेमध्ये कर्जमाफी विषयी शेतकऱ्यांमध्ये असणाऱ्या त्रुटी, माफ झालेले कर्ज व त्यातील येणारा फरक या विषयी सर्व माहिती देण्यात आली. नवीन खातेदारांना पीक कर्ज घेण्यासाठी लागणारे कागद पत्र कोणते द्यावे या साठीची सविस्तर माहिती देण्यात आली.
कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खासगी बँकांना सातबारा, आठ-अ, आधारकार्ड व २ छायाचित्रे, नवीन कर्जदारांसाठी फेरफार, मागील ५ वर्षांत मालकी हक्कात बदल असल्यास जुन्या कर्जदारांनाही फेरफार प्रमाणपत्र, कायदेशीर शोध अहवाल (लीगल सर्च रिपोर्ट) आणि दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत गहाणखताचे घोषणापत्र ही दोन्ही कागदपत्रे केवळ एक लाखावरील कर्जासाठी तसेच इतर बँकांचे ना-देय प्रमाणपत्र किंवा स्टँपपेपरवर शपथपत्र, तलाठ्यांनी दिलेला हातनकाशा किंवा तलाठ्यांनी जमीनीच्या हद्दी नमूद करून दिलेले कागदपत्र आदी कागदपत्र आवश्यक राहिल. अशा प्रकारची संपूर्ण माहिती देण्यात आली.
यावेळी शेतकरी व बँक कर्मचारी यांच्या मध्ये संवाद सुद्धा झाला. या किसान सभेला अमरावती येथिल आरबीओ कार्यालयातील श्री. वैद्य यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी एस.बी.आय.शाखा पळसखेड येथील व्यवस्थापक मनोहर कुंभारे, गावातील सरपंच रविकांत देशमुख, जेष्ठ नागरिक हरीचंद्र देशमुख, संजय कोकरे, नावरामजी ढगे, दत्तू पुनसे, किसनराव थोटे, अमोल ढोमने सह आदी शेतकरी उपस्थित होते.